मुंबई: उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत तब्येत सुधारल्यानंतर महिनाभराने पुन्हा प्रसारमाध्यमांसमोर आले आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असताना राऊतांनी भाजप तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर गंभीर आरोपांची सरबत्ती केली. (Sanjay Raut)

काय म्हणाले राऊत?
राऊतांनी दावा केला की भाजप शिंदे गटातील आमदार फोडण्याचा प्रयत्न करत आहे. “एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबाबत आम्ही काही बोलणार नाही; त्यांचा कोथळा अमित शाह काढतील, हे लिहून ठेवा,” असा थेट इशारा त्यांनी दिला. शिंदे गटातील तब्बल 35 आमदार फुटण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी म्हटले. रवींद्र चव्हाण यांची भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्तीही याच घडामोडींशी संबंधित असल्याचा आरोप राऊतांनी केला.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय तणाव वाढताना दिसत आहे. शिंदे गटातील नाराजी, शिवसेना-भाजपमधील दुरावा आणि तळकोकणातील राणे-संघर्ष या घटनांमुळे सत्ताधाऱ्यांत धुसफूस निर्माण झाली आहे.
एका मतामागे दहा ते पंधरा हजार रुपये
मतदानाच्या आदल्या दिवशी पैशांच्या व्यवहारांबाबतही राऊतांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “काही ठिकाणी एका मतामागे दहा ते पंधरा हजार रुपये दिल्याची माहिती मिळत आहे. इतका पैशांचा खेळ राज्यात कधीच झाला नव्हता,” असे त्यांनी स्पष्ट केले. गुलाबराव पाटलांनी ‘लक्ष्मी दर्शन’ होईल असे केलेल्या विधानाच्या संदर्भातही निवडणूक आयोगाने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.







