मुंबई : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कायदा व सुव्यवस्था आणि सार्वजनिक शांतता राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी २३ जुलै ते ६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत शहरात कलम १४४ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

मुंबई पोलिसांच्या आदेशानुसार, २३ जुलै रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ते ६ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंत हे प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील. या कालावधीत सार्वजनिक शांतता भंग होण्याची, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही पावले उचलण्यात आली आहेत.

या काळात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई असेल. तसेच कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका काढण्यास बंदी असेल. मिरवणुकांमध्ये लाऊडस्पीकर, वाद्ये, बँड तसेच फटाक्यांचा वापर करण्यासही परवानगी दिली जाणार नाही.
मात्र, काही बाबींना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. विवाह समारंभांवर कोणतीही बंदी नाही. अंत्यसंस्कार, स्मशानभूमी किंवा दफनभूमीकडे जाणाऱ्या अंत्ययात्रांनाही परवानगी असेल. कंपन्या, क्लब, सहकारी संस्था आणि इतर संघटनांच्या कायदेशीर बैठका तसेच नियमित सामाजिक बैठका सुरू राहतील.
याशिवाय चित्रपटगृहे, नाट्यगृहे, शैक्षणिक संस्था, सरकारी कार्यालये, न्यायालये, दुकाने, कारखाने आणि नियमित व्यावसायिक कामकाजावर कोणतेही निर्बंध नसतील. तसेच विभागीय पोलीस उपायुक्तांची पूर्वपरवानगी घेतलेल्या सभा आणि मिरवणुकांनाही या आदेशातून सूट देण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांनी नागरिकांना प्रतिबंधात्मक आदेशांचे पालन करून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.






