मुंबई: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर मागील पाच दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला राज्यभरतून मोठा प्रतिसाद मिळताना दिसत असून, दक्षिण मुंबईत हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलनकर्ते एकत्र आले आहेत.

या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आज (दि. 2 सप्टेंबर) दुपारपर्यंत आझाद मैदान रिकामे करण्याचे आदेश दिले. यासोबतच, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे न्यायालयाने आंदोलकांना दक्षिण मुंबईत न येण्याचे निर्देशही दिले आहेत.
न्यायालयाच्या आदेशानुसार, आझाद मैदानासह सीएसएमटी, मरीन ड्राईव्ह, हुतात्मा चौक आणि अन्य संवेदनशील भागांतून आंदोलकांना हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी अॅक्शन मोडमध्ये आले असून आंदोलनकर्त्यांचे वाहन तातडीने हटवण्यास सुरुवात केली आहे.
पूर्व मुक्त मार्गाखाली उभ्या केलेल्या गाड्याही दुसरीकडे वळवण्यात येत असून, या परिसरात वाहतूक पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे.
गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबईतील वाढती गर्दी आणि आंदोलनामुळे निर्माण झालेल्या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर, पोलिस व न्यायालय दोघेही पुढील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.







