मुंबई: मालाड पश्चिम येथे गुरुवारी पहाटे एक (Crime News) धक्कादायक घटना उघडकीस आली. एका केटरिंग (Mumbai News) फर्ममध्ये (Mumbai Crime) काम करणाऱ्या 21 वर्षांच्या दिलखुश साह या तरुणाची त्याच्या सहकाऱ्याने चाकूने गळा चिरून हत्या केली. ही घटना कामावरून परत येत असताना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश मंडल वय 25, हा दिलखुश साहची पत्नीबाबत केलेल्या टिंगलटवाळीमुळे त्रस्त झाला होता. साह वारंवार मंडलची पत्नी पाच वर्षांपूर्वी सोडून गेल्याचे सांगून त्याची खिल्ली उडवत असे. या सततच्या चिडवण्यामुळे मंडल संतापला आणि त्याने साहची हत्या केली.

दोघेही मूळचे बिहारमधील मधुबनीचे रहिवासी असून ते एका केटरिंग फर्ममध्ये एकत्र काम करत होते. गुरुवारी पहाटे दोघांना एका कामासाठी कांदिवलीला जायचे होते. कामावर जात असताना मालाड येथे दोघांमध्ये वाद झाला. रात्री अंदाजे 12.25 च्या सुमारास, लाइफलाइन हॉस्पिटलजवळील एका इमारतीच्या आवारातून जात असताना मंडलने आपल्या सोबत असलेल्या केटरिंगच्या चाकूने साहचा गळा चिरला. हल्ल्यानंतर साह जवळच्याच एका हॉलमध्ये गेला आणि तिथेच कोसळला.
घटनास्थळाची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तेथे धाव घेतली. साहला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी आरोपी गणेश मंडलला घटनास्थळावरून ताब्यात घेतले आणि त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांच्या चौकशीत मंडलने सांगितले की त्याचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही, परंतु दिलखुश साह सतत पत्नीबद्दल चिडवत असल्याने रागाच्या भरात त्याने हे कृत्य केल्याचे तो म्हणाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जात आहे.






