मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी आणि राज्याचा डोलारा सावरत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. राज्याच्या इतिहासात स्वतः मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडण्याची ही पहिलीच वेळ ठरली असून, फडणवीसांनी हा संपूर्ण अर्थसंकल्प आपल्या दिवंगत सहकाऱ्याला म्हणजेच अजितदादांना समर्पित केला.

अजित पवार आणि अर्थसंकल्प हे गेल्या दशकातील एक अतूट समीकरण होते. ‘कामाचा माणूस’ आणि शिस्तीचा प्रशासक अशी ओळख असलेल्या दादांनी अनेकदा राज्याची तिजोरी सावरली होती. त्यांच्या निधनानंतर अर्थमंत्रालयाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे घेतली. दरम्यान, केवळ आकड्यांचा खेळ न मांडता मुख्यमंत्र्यांनी अजितदादांच्या कार्याला साजेसे दोन मोठे निर्णय जाहीर केले:
१. भव्य स्मारक: अजितदादांच्या प्रशासकीय कौशल्याची आणि योगदानाची साक्ष देणारे एक भव्य स्मारक सरकार उभारणार आहे.
२. गतिमान नागरी सेवा पुरस्कार: दादांच्या नावाने राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना गतिमान नागरी सन्मान हा पुरस्कार दिला जाईल.
दरम्यान, आज सभागृहात घुमणाऱ्या ‘अजितदादा अमर रहे’च्या घोषणा आणि मुख्यमंत्र्यांचे भावूक संबोधन यामुळे यावेळचा अर्थसंकल्प राज्याच्या संसदीय इतिहासात कायमचा स्मरणात राहील. आता दादांच्या स्वप्नातील प्रगत महाराष्ट्र घडवण्याचे मोठे आव्हान मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर असणार आहे.






