पुणे: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गुढीपाडव्याच्या (Accident News) दिवशी घडलेल्या भीषण अपघाताने पुन्हा एकदा या महामार्गाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. लोणावळ्याजवळ गुरुवारी सकाळी झालेल्या या अपघातात आयआयटी मुंबईतील तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सलग दुसऱ्या (Mumbai-Pune Expressway) दिवशी झालेल्या अपघातामुळे केवळ दोन दिवसांत सहा जणांचा बळी गेल्याने ‘डेथ ट्रॅप’ची भीती पुन्हा अधोरेखित झाली आहे. (Latest Marathi News)

मृतांमध्ये ओमकुमार बोरसे (23), लय भारत (22) आणि श्रेयांश शर्मा यांचा समावेश आहे. हे तिघेही पवई येथील आयआयटी मुंबईमध्ये शिक्षण घेत होते. मिळालेल्या माहितीनुसार, हे विद्यार्थी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी लोणावळा येथे गेले होते. गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे ते पुन्हा मुंबईकडे परतत असताना हा अपघात घडला.
प्राथमिक तपासानुसार, एक्सप्रेसवेवर वेगाने वाहन चालवताना आणि ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्यांची पोलो कार नियंत्रणाबाहेर जाऊन पलटी झाली. अपघात इतका भीषण होता की तिघेही कारमध्ये अडकले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे हा राज्यातील सर्वात व्यस्त आणि महत्त्वाचा मार्ग असून, येथे वारंवार होणारे अपघात चिंतेचा विषय ठरत आहेत. वेगमर्यादा न पाळणे, बेफाम ड्रायव्हिंग आणि रेसिंगची प्रवृत्ती हे अपघातांचे प्रमुख कारण मानले जात आहे. या अपघातामुळे मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून शैक्षणिक वर्तुळातही हळहळ व्यक्त केली जात आहे.







