मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईचा मार्ग धरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या उपोषणाचा आज 16 वा दिवस असून, आंतरवाली सराटी येथे झालेल्या राज्यव्यापी बैठकीत त्यांनी ‘चलो मुंबई’चा नारा दिला. 15 सप्टेंबर रोजी हा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघणार असून 19 सप्टेंबरला आंदोलक मुंबईतील प्रसिद्ध आझाद मैदानावर दाखल होतील. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाज तिसऱ्यांदा मुंबईत धडकणार असून, आझाद मैदानावर ते दुसऱ्यांदा उपोषणाला बसणार आहेत.

विशेष म्हणजे गणेशोत्सवाचा काळ असतानाच हे आंदोलन जाहीर झाल्यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. आंतरवाली सराटीहून निघणारा हा मोर्चा पाटोदा, श्रीगोंदा, हडपसर आणि खोपोली या ठिकाणी मुक्काम करत 19 सप्टेंबरला मुंबईत पोहोचेल. मुंबईच्या या घोषणेनंतर स्थानिक समन्वयकांनी प्रवासाची व मुक्कामाची तयारी वेगाने सुरू केली आहे.

कालच्या बैठकीत जरांगे यांनी सरकारवर कोणतीही थेट टीका केली नाही. यामागे सरकारला तोडगा काढण्यासाठी आणि वाटाघाटी करण्यासाठी दिलेली ही शेवटची संधी असल्याचे मानले जात आहे. आंदोलकांना मुंबई गाठण्यासाठी 6 दिवसांचा कालावधी लागणार आहे. या काळात जर सरकारने आरक्षणाचा प्रश्न सोडवला, तरीही जरांगे पाटील आझाद मैदानावर जाऊन सरकारचे आभार मानतील आणि जनतेचे अभिवादन स्वीकारतील, असा निर्णय घेण्यात आला आहे.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल रात्री उशिरा अंबडच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन जरांगे पाटील यांच्याशी सुमारे 45 मिनिटे चर्चा केली. रात्री वैद्यकीय पथकाने त्यांच्या प्रकृतीची तपासणी देखील केली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस खबरदारी घेत आहेत. जरांगे पाटील यांनीही मराठा समाजाला हे आंदोलन अत्यंत शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले आहे. आता पुढील दोन दिवसांत सरकार यावर काय तोडगा काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






