महेंद्र शिंदे

खेड शिवापूर : कोंढणपूर फाटा ते सिंहगड या रस्त्यावरील श्रीरामनगर ते शिवापूर वाडा या टप्प्यातील अपूर्ण असलेले रस्त्याचे काम अपघाताला निमंत्रण देत आहे. या कामाच्या बिलाचे पैसे मिळाले नसल्याने उरलेले रस्त्याचे काम पूर्ण करता येत नसल्याचे या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे म्हणणे आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार यांच्या गोंधळात या रस्त्यावरील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
हायब्रीड आन्युटी प्रकल्पाअंतर्गत कोंढाणपूर फाटा ते सिंहगड या रस्त्याचे काम करण्यात आले आहे. मात्र श्रीरामनगर ते शिवापूर वाडा या टप्प्यातील रस्ता काँक्रिटीकरण करण्याची स्थानिक नागरीकांची मागणी होती. त्यानुसार दोन वर्षापूर्वी या टप्प्यातील रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू झाले. त्यातील सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र उर्वरीत दहा टक्के अपूर्ण कामामुळे नागरीकांची गैरसोय होत आहे. त्यात पाऊस सुरू असल्यास याठिकाणी अपघात होत आहेत.
याबाबत या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराशी बोललो असता “गेल्या वर्षी केलेल्या कामाचा निधी शासनाकडे आला होता. मात्र त्या निधीचे मुदतीत वितरण न केल्याने हा निधी परत गेला. त्यामुळे निधी नसल्याने या रस्त्याचे उर्वरीत काम पूर्ण करता येत नाही. शासनाकडून बिले मिळाल्यास ताबडतोब रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.







