Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे दरम्यानचा प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ ने मोठा निर्णय घेतला आहे. वाढत्या वाहतूक ताणामुळे आणि वारंवार होणाऱ्या कोंडीमुळे मुंबई–पुणे एक्सप्रेसवेचे 6 पदरी स्वरूप आता थेट 10 पदरी करण्याची योजना आखण्यात आली आहे. या प्रकल्पाचे काम पावसाळ्यानंतर सुरू होणार असल्याची माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांनी दिली.

सध्या हा एक्सप्रेसवे देशातील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी एक आहे. दररोज हजारो वाहनांची ये-जा होत असल्याने, विशेषतः सुट्टीच्या दिवशी आणि सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम होतो. याच पार्श्वभूमीवर 10 पदरीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सुमारे 3 वर्षांचा कालावधी अपेक्षित असून, 2029-30 पर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. (Mumbai Pune Expressway)
या विस्तारामुळे मुंबई ते पुणे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. सध्या 2.5 ते 3 तास लागणारा प्रवास भविष्यात अधिक वेगवान होण्याची शक्यता आहे. तसेच अपघातांचे प्रमाण कमी होऊन प्रवास अधिक सुरक्षित होईल, अशी अपेक्षा आहे. काम सुरू असताना वाहतुकीवर परिणाम होऊ नये, यासाठी टप्प्याटप्प्याने नियोजन करण्यात येणार आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार असून तो वित्तीय संस्थांकडून कर्ज स्वरूपात उभारला जाणार आहे. याची परतफेड करण्यासाठी टोल वसुलीची मुदत सध्याच्या 2045 वरून वाढवून 2060 पर्यंत नेण्याचा प्रस्ताव आहे, म्हणजेच तब्बल 15 वर्षांची वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रवाशांवर आर्थिक भार वाढेल, मात्र बदल्यात वेळ आणि इंधनाची बचत होईल.
दरम्यान, एक्सप्रेसवेवरील 13 किमी लांबीचा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प मे 2026 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. हा मार्ग लोणावळा–खंडाळा घाटातील वळणदार रस्त्याला पर्याय ठरणार असून प्रवास अधिक सरळ, जलद आणि कमी वेळेत पूर्ण होईल. एकूणच, हे प्रकल्प महाराष्ट्राच्या वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये मोठा बदल घडवणार आहेत.







