हिंगोली : मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत न केल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकी कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला दिली आहे. संतोष बांगर (Santosh Bangar) आणि पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यामधील संभाषणाचा एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या कॉलमध्ये शिंदे गटाचे आमदार अधिकाऱ्यावर चांगलेच संतापल्याचे दिसून आले.

पीक विमा अधिकारी आणि संतोष बांगर यांच्यातील संभाषण?

पीक विमा अधिकाऱ्यासोबत बोलताना संतोष बांगर म्हणाले, ‘यंदाच्या पुरात शेतकऱ्यांची राख रांगोळी झाली, त्यांच्याकडे काहीही राहिलं नाही. त्यामुळे तुमच्याकडे काहीही ठेऊ नका, शेतकऱ्यांना संकटकाळी मदत करा. सोयाबीन, कापूस आणि तुरी गेल्या. शेतातील माती सगळी वाहून गेली. मराठवाड्यामध्ये अतिशय भयानक परिस्थिती आहे, शेतकऱ्याचं जगणं वाट लागलं आहे. त्यामुळे वस्तुस्थितीला धरून सर्व्हे करा.

जर यात काही कमी जास्त झालं तर संतोष बांगरसारखा वाईट माणूस नाही. हिंगोलीत एकही माणूस ठेवणार नाही. तुमच्या ऑफिसचा चुराडा करेन. तुमचे हात पाय सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्यांचे हित पाहा. अशी धमकीच संतोष बांगर यांनी दिली असल्याचं ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे.
मी या नंतर पुन्हा बोलणार नाही, जे काही आहे ते नियमानुसार करा असं बांगर म्हणाले. त्यावर पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्याने भाऊ आम्ही वस्तुस्थितीनिष्ठच पंचनामा करू, अशी ग्वाही बांगर यांना दिली.
दरम्यान, संतोष बांगर यांच्या व्हायरल काॅल रेकाॅर्डिंगनंतर त्यांच्यावर टीका होण्याऐवजी त्यांचे समर्थन होताना दिसत आहे.







