पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज 6 वा दिवस आहे. जरांगे यांची प्रकृती खालावत असताना दुसरीकडे बीड जिल्ह्यातील संगम गावचे रहिवासी असलेले 40 वर्षीय दशरथ रायकर यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत चालल्यामुळे राज्यभरातून अनेक कार्यकर्ते आणि समाजबांधव त्यांच्या भेटीसाठी व पाठिंब्यासाठी आंदोलनस्थळी एकत्र येत आहेत. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील संगम गावचे रहिवासी असलेले 40 वर्षीय दशरथ रायकर हेदेखील या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अंतरवाली सराटी येथे दाखल झाले होते. मात्र, आंदोलनस्थळी असताना दशरथ रायकर यांची अचानक तब्येत बिघडली आणि ते खाली कोसळले.

यादरम्यान त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी नेण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु प्राथमिक माहितीनुसार तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा तिथेच दुर्दैवी मृत्यू झाला. एकीकडे जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे आंदोलनातील वातावरण आधीच संवेदनशील बनले आहे. त्यातच निष्ठावंत आंदोलकाचा असा अचानक मृत्यू झाल्याने अंतरवाली सराटी परिसरासह बीड जिल्ह्यात आणि संपूर्ण मराठा समाजात प्रचंड हळहळ व शोककळा पसरली आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारने शोधलेल्या 58 लाख कुणबी नोंदींच्या आधारे मराठा समाजाला तत्काळ जातीचे दाखले देण्यात यावेत, आता सरकारला अधिक वेळ दिला जाणार नाही, असा इशारा दिला आहे. हे आपले ‘शेवटचे आंदोलन’ असेल, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले आहे.






