दिल्ली : नवी दिल्ली येथे सध्या मतदारयादीच्या विशेष तीव्र पुनरावृत्ती मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर पडताळणी सुरू आहे. या प्रक्रियेत तयार करण्यात आलेल्या प्रारुप मतदारयादीनंतर एक थक्क करणारी माहिती समोर आली आहे. मतदार नोंदींमधील तफावतींमुळे थेट निवडणूक आयुक्त एस. एस. संधू, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांना व उच्चपदस्थांना एसआयआर नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

या नोटीस यादीमध्ये भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व त्यांची कन्या प्रतिभा अडवाणी, काँग्रेस नेते कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, तसेच परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासारख्या सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींच्या नावांचा समावेश आहे. निवडणूक आयुक्त एस. एस. संधू यांच्या बाबतीत जुन्या नोंदी आणि उपलब्ध कागदपत्रांमधील नावाच्या स्पेलिंगमध्ये फरक आढळला आहे.तर कपिल सिब्बल आणि विक्रम मिस्री यांच्या नावांची पडताळणी करताना जुन्या एसआयआर नोंदींशी नाव जुळले नाही.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर व त्यांच्या पत्नी के. एस. जयशंकर यांच्यासह इतर काहींच्या नोंदींमध्ये माहितीची तार्किक विसंगती दिसून आली आहे.प्रारुप यादीत नाव असणे किंवा नोटीस मिळणे म्हणजे संबंधित व्यक्तीचे नाव मतदारयादीतून रद्द झाले आहे असा याचा अजिबात अर्थ होत नाही. तसेच हा मतदाराच्या पात्रतेवरील कोणताही अंतिम निर्णय नसून केवळ प्रशासकीय पडताळणीचा एक भाग आहे.

जुन्या नोंदी आणि सद्यस्थितीतील माहिती यांची अचूक परस्पर-पडताळणी करून मतदारयादी पूर्णपणे त्रुटीमुक्त करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. कागदपत्रांचे स्पष्टीकरण प्राप्त झाल्यावर या नोंदी अद्ययावत केल्या जाणार आहेत.






