मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) महिला सुरक्षिततेबाबत बोलले जात असतानाच राज्यात एका वर्षात तब्बल 48 हजार 278 महिला बेपत्ता झाल्या असून, हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढला आहे. राज्यात 2024 मध्ये बेपत्ता महिलांची संख्या 45 हजार 662 होती, जी 2025 मध्ये वाढून 48 हजार 278 वर पोहोचली आहे. चिंतेची बाब अशी की, बेपत्ता होणाऱ्या प्रत्येक महिलेचा शोध लावण्यात यंत्रणेला अद्याप यश आलेले नाही. 2025 मध्ये बेपत्ता झालेल्यांपैकी 36 हजार 581 महिलांचा शोध लागला असला, तरी हजारो महिला अद्यापही बेपत्ताच आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा आकडा जाहीर केला आहे. मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर सारख्या मोठ्या शहरांत हे प्रमाण अधिक आहे. बेपत्ता मुलांच्या शोधासाठी राज्यात ‘ऑपरेशन मुस्कान’ प्रभावीपणे राबवले जात आहे. 2015 पासून आतापर्यंत 13 वेळा ही मोहीम राबवण्यात आली असून, यामुळे अनेक घरांत पुन्हा आनंदाचे वातावरण परतले आहे.
मात्र, दुसरीकडे नवजात बालकांच्या विक्रीचे रॅकेट सक्रीय आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यात मानवी तस्करीचे 5 गंभीर गुन्हे दाखल झाले असून, यामागे मोठ्या टोळ्या सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे. मानवी तस्करी आणि नवजात बालकांच्या विक्रीचे रॅकेट मुळापासून उपटून टाकण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असून पोलिस सध्या अधिक तपास करत आहेत.







