खोर : दौंड तालुक्यातील खोर येथील काळभैरवनाथ देवाच्या उत्सवानिमित्त उच्चस्तरिय कुस्ती आखाडा पार पडला. यामध्ये प्रथम क्रमांकाची कुस्ती (१ लाख ५१ हजार रुपये)महान भारत केसरी पै. सिकंदर शेख विरुद्ध दिल्ली येथील बंटीकुमार सिंग यांच्यामध्ये झाली.अत्यंत रोमहर्षित लढत पहायला मिळाली.अशा लढतीत पै. सिकंदरने बंटीकुमारला निकाली डावावर आसमान दाखवत विजय मिळवला. कुस्ती पाहण्यासाठी दौंड,पुरंदर,बारामती, शिरूर,तालुक्यातील नागरिकांनी प्रचंड मोठी गर्दी केली होती.

द्वितीय क्रमांकाची(४१ हजार रुपये) कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन सतीश खरात विरुद्ध वीरेंद्रसिंह दहीया यांच्यात झाली. यामध्ये पै.सतीश खरात ने दहियाला चितपट करत विजयी झाला.तृतीय क्रमांकाची कुस्ती(३१ हजार रुपये)पै. सुमित मरगजे विरुद्ध पै. व्यंकटेश बनकर यांच्यात झाली. त्यात पै. सुमित मरगजे विजयी झाला. चतुर्थ क्रमांकाची कुस्ती (२५ हजार रुपये)पै.नाथा चौगुले विरुद्ध पै.शेखर जाधव यांच्यामध्ये झाली. त्यात छडी टांग डाव टाकत पै. नाथा चौगुले विजयी झाला. पाचव्या क्रमांकाची कुस्ती (२५ हजार रुपये)पै. शंकर माने विरुद्ध विनायक वाल्हेकर यांच्यात झाली. त्यात पै.शंकर माने दुहेरी पटावर विजयी झाला.
अशा नामांकित पैलवानांची खोरच्या मैदानात ५४ वर्षानंतर प्रथमच हजेरी लावल्याने व कुस्त्यांना आणखीनच रंगतदार बनवण्यासाठी कुस्तीप्रेमींना व कुस्तीपटूंना प्रोत्साहित करण्याचे काम अंबाजी आणि लिंबाजी यांच्या हलगी ग्रुपने (खंडाळा) हलगीवादन करत केले व प्रसिद्धी कुस्ती निवेदक पै.प्रा.सागर चौधरी यांनी उपस्थित कुस्तीप्रेमींना आपल्या मधाळ वाणीतूनं मंत्रमुग्ध असे निवेदन करत कुस्ती शोकीनांच्या डोळ्याचे पारणे फेडले.यावेळी खोर गावची महिला पै.राज्य सुवर्ण पदक विजेती समीक्षा शाम चौधरी हिचा ग्रामस्थांच्या वतीने नागरीसत्कार करण्यात आला.
खोर येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून सुमारे चार लाख रुपये खर्च करून कोल्हापूर पद्धतीचे खासबाग कुस्ती मैदान तयार केले असून या मैदानाची आसनक्षमता जवळपास ७०० ते ८०० लोकांची बनवण्यात आली आहे.यामध्ये कुस्ती पहावयास आलेल्या प्रमुख पाहुण्यांना बसण्यासाठी प्रशस्त स्वतंत्र वेगळी व्यवस्था तसेच प्रेक्षकांसाठीही बसण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे.खरतर दर दोन तीन वर्षांनी या खोर गावाला दुष्काळी संकटाला सामोरे जावे लागते.पण येथील लोकांची कुस्तीविषयी असलेले प्रेम,आस्था व मैदानपाहून मी प्रत्येक वर्षी खोरला कुस्ती खेळायला येणार असा शब्द देत पै.सिकंदर शेख याने ग्रामस्थांचे विशेष कौतुक केले.
आमचे खोर गाव वांगी व कुस्ती या दोन गोष्टीसाठी प्रसिद्ध होते पण गेली १९७० सालापासून कुस्त्यांचा आखाडा मनाप्रमाणे होत नव्हता हीच सल गावातील कुस्तीशोकींना होती मात्र यावर्षी ५५ वर्षांची सल भरून काढण्यात आम्हा सर्वांना यश आले.यामध्ये ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य मिळाले म्हणूनच दौंड तालुक्यातील प्रथमच यशस्वी व विक्रमी कुस्ती आखाड्याचे आयोजन करू शकलो असे आयोजक सागर चौधरी यांनी सांगितले.
प्रत्येक गावात चार पैलवान तयार व्हावे यामुळे कोणाची गावाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही, प्रत्येक गावाने खोरचा आदर्श घेत कुस्ती मैदाने तयार करावीत, घराघरात पैलवान तयार करावेत कुस्ती वाढवावी,रुजवावी यामुळे पैलवान तयार होतील व उद्या हेच पैलवान देशासाठी मेडल मिळवतील, असे महान भारत केसरी महाराष्ट्र केसरी पै.सिकंदर शेख यांनी सांगितले.







