पुणे : महाराष्ट्रात सध्या बालगुन्हेगारीचे प्रमाण चिंतेचा विषय ठरत आहे. या गंभीर समस्येला आळा घालण्यासाठी आता राज्य सरकार कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. बाल गुन्हेगारांचे वय सध्या कायद्यानुसार 18 वर्षे मानले जाते, मात्र हे वय कमी करून 16 वर्षे करण्यात यावे, असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवणार असल्याची महत्त्वाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हेगारी विश्वातील एक धक्कादायक प्रकार समोर आणला. सध्याच्या कायद्यानुसार लहान मुलांना थेट अटक करता येत नाही, तर त्यांना बालगृहात ठेवले जाते. याच नियमाचा गैरफायदा काही गुन्हेगारी टोळ्या घेत आहेत. 16 वर्षांपेक्षा लहान असणाऱ्या मुलांचा वापर करून ही मोठी रॅकेट्स गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून घेत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा लहान मुलांना गुन्हेगारीच्या गर्तेत ढकलणाऱ्या टोळ्यांवर आता थेट ‘मकोका’ अंतर्गत कडक कारवाई केली जाईल, असा सज्जड दम मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

जालना जिल्ह्यात लहान मुलांमध्ये वाढणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीबाबत आमदार अर्जुन खोतकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्री उत्तर देत होते.या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी राज्य सरकार एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करणार आहे. ही समिती वैज्ञानिक दृष्टिकोनातून या विषयाचा अभ्यास करेल आणि अशा टोळ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी कायदेशीर पर्याय शोधेल.
याच वेळी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नवीन पद्धतीचा पर्दाफाश केला. ही टोळी व्यापाऱ्यांना केवळ खंडणीसाठी धमकावत नाही, तर दहशत निर्माण करण्यासाठी भाडोत्री गुंडांकरवी थेट त्यांच्या घरांवर किंवा कार्यालयांवर गोळीबार करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या नव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.







