सांगली: राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची तारीख आणि वेळ जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आयोगाच्या भूमिकेवर टीका केली. आज महापालिका निवडणुकांची घोषणा होत असताना, नगरपालिका निवडणुकांचा निकाल अद्याप जाहीर झालेला नसणे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, नगरपालिका निवडणुकांचे निकाल प्रलंबित असताना महापालिका निवडणुकांची घोषणा करणे योग्य नाही. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुसूत्रता आवश्यक असून, आयोगाने याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
काय म्हणाले जयंत पाटील?
दरम्यान, विधानसभेत पोलिसांबाबत वापरलेल्या “हजामत” या शब्दप्रयोगावरून निर्माण झालेल्या वादावरही जयंत पाटील यांनी खुलासा करत नाभिक समाजाची जाहीर माफी मागितली. “बोलण्याच्या ओघात तो शब्द माझ्या तोंडून निघाला. तो वापरण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता. त्यामुळे संपूर्ण नाभिक समाजाची मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो,” असे त्यांनी म्हटले आहे.
पोलीस काय हजामत करतात का?
विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना जयंत पाटील यांनी गृहखात्यावर जोरदार टीका केली होती. बीड जिल्ह्यातील राम खाडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात सभागृहात निवेदन करताना त्यांनी “पोलीस काय हजामत करतात का?” असा शब्दप्रयोग केला होता. या विधानावर सत्ताधारी पक्षातील सदस्यांनी आक्षेप घेतल्यानंतर सभागृहात जोरदार खडाजंगी झाली होती.
या पार्श्वभूमीवर, जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा ही चूक अनवधानाने झाली असे स्पष्ट केले. “माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो,” असेही ते म्हणाले आहेत.







