ajit pawar : पुणे शहरासमोर पाणीटंचाई, वाहतूक कोंडी, गुंडगिरी, प्रदूषण आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसारखे प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहेत. आता या सगळ्यांवर फक्त बोलून चालणार नाही, तर शिस्त लावून ठोस निर्णय घ्यावे लागतील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच खराडी आणि वडगावशेरी टँकरमुक्त करणार अशी मोठी घोषणा त्यांनी केली.

१५ तारखेला होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडगाव शेरी–विमाननगर परिसरात झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.
पाण्याच्या मुद्द्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, पुण्यात पाणीटंचाई निर्माण झाली तर उपलब्ध धरणांमधून शहराला योग्य प्रमाणात पाणी दिलं जाईल. पुण्याच्या हक्काच्या पाण्यासाठी गरज पडली, तर न्यायालयातही जाण्याची तयारी आहे. ब्रिटिश काळात झालेले करार आजच्या काळात चालणार नाहीत. आधी माणसांना पाणी देणं हेच आमचं प्राधान्य आहे, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. वडगाव शेरी, विमाननगर आणि पूर्व पुण्यातील पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. (ajit pawar)
नगर रोडवरील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नदीकाठचा रस्ता लवकर सुरू केला जाईल, विमाननगर चौक ते शिरूरदरम्यान रस्त्यांची कामं हाती घेतली जातील. फिनिक्स मॉल परिसरातील ट्रॅफिक सुधारणा, सुरक्षित पादचारी क्रॉसिंग आणि नियोजनबद्ध वाहतूक यावर भर दिला जाईल. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेतला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर बोलताना अजित पवार म्हणाले की, रहिवासी भागात उशिरापर्यंत सुरू असलेले पब, हॉटेल्स, वाढती गुंडगिरी आणि नशेचे प्रकार यावर कडक कारवाई केली जाईल. महिला आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस चौक्या उभारल्या जातील. चुकीचं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही थेट कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
पर्यावरणाबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की, नदी सुधार प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया, स्वच्छता, हवेचं प्रदूषण कमी करणं, मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि सोलर पॅनल बसवण्यावर भर दिला जाईल. दररोज पाणीपुरवठा आणि स्वच्छ शहर ही आमची पाच प्रमुख प्राधान्यं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मेट्रो आणि पीएमपीएलचा जास्तीत जास्त वापर गरजेचा असल्याचं सांगत, सार्वजनिक वाहतूक मोफत करण्याचा मुद्दा त्यांनी पुन्हा एकदा मांडला. यामुळे प्रदूषण कमी होईल आणि नागरिकांचा वेळ व पैसा दोन्ही वाचेल, असा दावा त्यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, हा पक्ष पुण्याच्या मातीतला आहे आणि स्थानिक प्रश्नांची जाण असलेला आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
शेवटी त्यांनी पुणेकरांना आवाहन करत सांगितलं की, १५ तारखेला मतदान करून पुण्याचा चेहरा बदला. विकासाच्या वाटेवर शहराला नेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मोठ्या बहुमताने विजयी करा, असं म्हणत त्यांनी भाषणाचा समारोप केला.







