खुलताबाद: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. वेरुळ घाटातून प्रवास करणाऱ्या एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला करत, साखरपुडा झालेल्या तरुणीचं अपहरण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (१३ जुलै रोजी) छत्रपती संभाजीनगरमधील सिडको परिसरात मुलीच्या साखरपुड्यासाठी मोहाडी येथील एक कुटुंब गेले होते. दुपारी साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर कुटुंब रात्री उशिरा (सुमारे १० वाजता) आपल्या एमएच १८ बीआर २५१८ क्रमांकाच्या वाहनाने घराकडे परतत होते.

घरी परतत असताना हल्लेखोरांनी अचानक कुटुंबावर तलवार आणि कोयत्याने हल्ला करत वेरुळ घाटातील चांगोबाच्या वळणाजवळ तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली. गाडीच्या काचा फोडल्या. या हल्ल्यात गाडीचा चालक कैलास शिंदे जखमी झाला, तर गाडीत असलेल्या चार वर्षांच्या पीयूषलाही गंभीर दुखापत झाली. हल्ल्यानंतर, हल्लेखोरांनी नियोजित वधूला जबरदस्तीने त्यांच्या गाडीत बसवले आणि घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गाडीत एकूण चार महिला, तीन पुरुष आणि दोन लहान मुले प्रवास करत होती.
कुटुंबीयांनी तात्काळ खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांनी तत्काळ तपास सुरु केला असून हल्लेखोरांचा उद्देश नेमका काय होते याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. पोलीस या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत आहेत. मात्र, घाटातून एका तरुणीचं अशाप्रकारे अपहरण झाल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.





