पुणे: अभियांत्रिकी ( Engineering Admission 2025) पदवी, पदविका आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. राज्य सरकारने प्रवेश प्रक्रियेत मोठे बदल करणारी अधिसूचना जारी केली असून, त्यानुसार ‘सीईटी सेल’च्या सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक सुधारणा करण्याची प्रक्रिया सध्या वेगाने सुरू आहे. ही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेश फेऱ्या सुरू होतील, असे महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) स्पष्ट केले आहे.

राज्य सरकारच्या सुधारित नियमांनुसार, राज्यातील कोणत्याही संस्था स्तरावरील २० टक्के प्रवेश हे गुणवत्तेनुसार केले जातील, असेही नव्या नियमावलीत नमूद करण्यात आले आहे. या महत्त्वाच्या बदलांमुळे ‘सीईटी सेल’ ला आपल्या सध्याच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविणाऱ्या सॉफ्टवेअरमध्ये मोठे बदल करावे लागत आहेत. आता अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी तीनऐवजी चार केंद्रीय प्रवेश फेऱ्या घेतल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांना चारही फेऱ्यांमध्ये प्रवेशाची संधी मिळावी यासाठी अनेक प्रकारचे पर्याय उपलब्ध करून दिले जातील.
काय आहेत नवे बदल?
‘सीईटी सेल’चे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षण विभागामार्फत संस्थांच्या नोंदणीची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. दरम्यान, प्रवेश प्रक्रियेत झालेल्या बदलानुसार सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याची प्रक्रिया सध्या ‘सीईटी सेल’मार्फत सुरू आहे.
‘सीईटी’ परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून विद्यार्थ्यांना आता केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची उत्सुकता लागली आहे. सॉफ्टवेअरमधील सुधारणा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यंत्रणेचे मूल्यमापन केले जाईल आणि त्यानंतरच उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सूचनेनुसार प्रवेश प्रक्रिया अधिकृतपणे सुरू केली जाईल, असे सरदेसाई यांनी स्पष्ट केले.







