pune leopard terror : पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि खेड तालुक्यांमध्ये बिबट्याच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. वारंवार होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यांने या भागात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गेल्या दोन आठवड्यांत या परिसरात बिबट्याने अनेकांवर हल्ले केले असून आतापर्यंत या हल्ल्यांमध्ये 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे.

बुधवारी नाईक यांनी पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केलं. आणि माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान याच वेळी बिबट्याच्या हल्ल्याच्या या वाढत्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरोधात आंदोलन छेडले होतं. यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी या आंदोलकांची भेट घेतली. यावेळी नाईक यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. दरम्यान या संवादात बिबट्याने या भागात धुमाकूळ घातला असून गुरांवरही मोठ्या प्रमाणावर हल्ले होत असल्याचं सांगितलं.
मी मंत्री नाही, माणूस म्हणून आलो – गणेश नाईक
नाईक यांनी गावकऱ्यांशी संवाद साधताना सांगितलं, “मी इथे मंत्री म्हणून नाही, तर माणूस म्हणून आलो आहे. प्रशासनाने आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करू नयेत. असंही ते म्हणले.
ते म्हणाले की उसाच्या रानात ससे, कोल्हे. लांडगे यांसारखे प्राणी राहत असल्याने बिबट्यांना आयती शिकार मिळते. यात दोष कुणाचा? असा प्रश्न ही त्यांनी केला.
“हिंसक बिबट लोकांसमोर आला, तर गोळ्या घाला”
सोबतच वनमंत्री नाईक यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. जर हिंस्रक बिबट लोकांसमोर आला आणि धोका निर्माण झाला, तर त्याला गोळ्या घाला. लोकांचा जीव महत्त्वाचं आहे असंही त्यांनी म्हटलं.
वाढती समस्या, वाढता तणाव
गेल्या काही वर्षांत या भागात बिबट्यांची संख्या वाढल्याचं वन विभागाचं निरीक्षण आहे. रात्रीच्या वेळी जनावरांचं रक्षण करण्यासाठी ग्रामस्थांना जागं रहावं लागतं. आता प्रशासन आणि वनविभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.






