सांगली: सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातून एक अतिशय अस्वस्थ करणारी घटना समोर आली आहे. अवघ्या 300 रुपयांच्या किरकोळ वादातून सख्ख्या भावांवर प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार बापूवाडी येथे घडला आहे. याप्रकरणी तासगाव पोलिसांनी स्वप्निल विठ्ठल माने (वय 28) याला तातडीने ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लिंगाप्पा विठ्ठल माने (वय 26) यांनी आपल्या आत्याकडून 300 रुपये घेतले होते. या पैशांच्या देवाणघेवाणीवरून लिंगाप्पा आणि आरोपी स्वप्निल यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होता. आरोपीने यापूर्वीही लिंगाप्पाला “बघून घेतो तुला” असे म्हणत धमकी दिली होती. बुधवारी रात्रीच्या वेळी लिंगाप्पा आणि त्याचा भाऊ प्रणव हे दोघे आपल्या घरी शांत झोपलेले असताना स्वप्निलने अचानक त्यांच्यावर हल्ला केला.

स्वप्निलने अत्यंत क्रूरपणे दोघांच्याही डोळ्यांत मिरची पूड फेकली, जेणेकरून त्यांना काहीही दिसू नये. त्यानंतर त्याने फळे कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या धारदार कटरने लिंगाप्पाच्या मानेवर गंभीर वार केले. एवढ्यावरच न थांबता त्याने प्रणववरही कटरने हल्ला केला, ज्यामध्ये त्याच्या हाताला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. अचानक झालेल्या या भीषण हल्ल्यामुळे दोघेही भाऊ रक्तबंबाळ झाले होते.
प्राण वाचवण्यासाठी दोन्ही जखमी भावांनी जिवाच्या आकांताने तासगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी तत्काळ पावले उचलत आरोपी स्वप्निल माने याला अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.





