नागपूर: शहरातून माणुसकीला काळीमा फासणारी (Shocking News) धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. आर्थिक अडचणी आणि शिस्तीच्या (Nagpur News) नावाखाली एका दाम्पत्याने आपल्या अवघ्या 12 वर्षांच्या मुलाला तब्बल 3 ते 4 महिन्यांपासून साखळदंडाने बांधून ठेवल्याचा अमानुष प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे नागपूर शहरात एकच खळबळ उडाली असून पालकत्व, बालहक्क आणि सामाजिक संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. (Latest Marathi News)

पीडित मुलाचे आई-वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. दोघांनाही दिवसभर कामासाठी घराबाहेर राहावे लागत असल्याने घरात कोणी नसते. या काळात मुलाचे वर्तन बिघडत चालल्याचा दावा पालकांनी केला आहे. मुलाला चोरीची सवय लागली होती. तो घराबाहेर जाऊन मोबाईल, सायकलसारख्या वस्तू उचलून आणत असे, तसेच आपल्या लहान भावालाही सोबत घेऊन जात असल्याचे आईने सांगितले.
या प्रकरणावर मुलाच्या आईने प्रतिक्रिया देताना धक्कादायक कबुली दिली आहे. परिसरातील नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत होत्या. आम्ही त्याला समजावून सांगितले, मारूनही पाहिले, डॉक्टरांकडे नेले, पण तो तिथूनही पळून जायचा, असे आईने सांगितले. या सगळ्याला कंटाळून आणि मुलगा कुठे बाहेर जाऊन चुकीचे कृत्य करू नये, या उद्देशाने आम्ही त्याला साखळदंडाने बांधून ठेवण्याचा निर्णय घेतला, अशी कबुली पालकांनी दिली आहे. तसेच आम्ही त्याला दिवसातून फक्त 2 तास बांधून ठेवत होतो, असेही आईने सांगितले.
मात्र तज्ज्ञांच्या मते हा प्रकार अत्यंत गंभीर आणि अमानवी आहे. कोणत्याही परिस्थितीत मुलावर अशी वागणूक योग्य ठरू शकत नाही. मुलाचे वर्तन समस्यात्मक असले तरी समुपदेशन, वैद्यकीय उपचार, शाळा प्रशासन किंवा बालकल्याण यंत्रणांची मदत घेणे आवश्यक होते. शारीरिक बंधन आणि मानसिक छळामुळे मुलाच्या मानसिक आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि बालकल्याण समितीने तातडीने दखल घेतली. मुलाला सुरक्षित ठिकाणी हलवून त्याचे समुपदेशन आणि वैद्यकीय तपासणी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी पालकांविरोधात कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता असून पुढील चौकशी सुरू आहे.







