Crime News: वर्धा : वर्धा जिल्ह्यात रेती घाटाच्या वादातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेजवळ दोन गटांमध्ये झालेल्या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या (Murder) करण्यात आली. या घटनेमुळे दोन्ही जिल्ह्यांत मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुलगाव येथील भाजपा नगरसेविकेचे पुत्र भरत नागपाल हे रेती घाटाचे काम पाहत होते. वर्धा आणि वरोरा सीमेवरील वेणा नदी पात्रातील रेती घाटाच्या पैशांच्या व्यवहारावरून काही दिवसांपासून दोन गटांमध्ये तणाव सुरू होता. हा वाद रविवारी रात्री उशिरा उग्र झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गटांतील लोकांनी एकमेकांवर हल्ला केल्याची माहिती आहे.
तलवारीने सपासप वार
या गोंधळात भरत नागपाल यांच्यावर तलवारीने वार करण्यात आले. हल्ला अतिशय गंभीर असल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपींनी मृतदेह वेणा नदीच्या पात्रात टाकल्याचे समोर आले आहे. या मारामारीत आणखी 3 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संशयितांना अटक
घटनेची माहिती मिळताच वडनेर आणि वरोरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जलद कारवाई करत 3 संशयितांना अटक केली आहे. मात्र, या प्रकरणातील काही आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. ही घटना वरोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पुढील तपास सुरू आहे.
एका लोकप्रतिनिधीच्या मुलाची अशा प्रकारे हत्या झाल्याने राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे. परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी खबरदारी वाढवली आहे.




