Ration Card : मुंबई : रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 1 एप्रिलपासून रेशनकार्डसंबंधी काही नवीन नियम लागू होणार आहेत. या नियमांनुसार लाभार्थ्यांची पात्रता अधिक काटेकोरपणे तपासली जाणार आहे. त्यामुळे निकषांमध्ये न बसणाऱ्या अनेक लोकांचे रेशनकार्ड रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे रेशनकार्ड वापरणाऱ्या नागरिकांनी नवीन नियमांची माहिती घेणे आवश्यक आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि खरोखर गरजू कुटुंबांपर्यंत धान्य पोहोचावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून ही सुधारणा करण्यात येत आहे. देशभरात वन नेशन, वन रेशनकार्ड ही योजना प्रभावीपणे लागू करण्यात येत आहे. या योजनेमुळे लाभार्थ्यांना देशातील कोणत्याही राज्यात रेशन मिळू शकते. मात्र यासाठी पात्रतेची तपासणी अधिक कठोर केली जाणार आहे.
नवीन नियम लागू झाल्यानंतर चुकीची माहिती देऊन रेशनकार्ड घेतलेल्या किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबांची नावे यादीतून काढली जाणार आहेत. प्राथमिक अंदाजानुसार देशभरात सुमारे 70 लाख रेशनकार्ड रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नियमांनुसार शहरी भागातील कुटुंबांसाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 3 लाख रुपये आणि ग्रामीण भागासाठी 2 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. यापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच चारचाकी वाहन, 100 चौरस मीटरपेक्षा मोठी मालमत्ता किंवा घरातील एखादी व्यक्ती आयकर भरत असल्यासही त्या कुटुंबाची पात्रता रद्द होऊ शकते.
याशिवाय सर्व रेशनकार्डधारकांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. केवायसी पूर्ण न केल्यास रेशनकार्ड तात्पुरते बंद होऊ शकते. नागरिकांना ही प्रक्रिया जवळच्या रेशन दुकानात जाऊन पूर्ण करता येणार आहे.







