नाशिक: नाशिकमधील कथित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात प्रकरणाने (Ashok Kharat Case) आता राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. महिलांवर अत्याचाराच्या गंभीर आरोपांवरून अटक झालेल्या या प्रकरणाला आता थेट राजकीय रंग चढला असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. (Latest Marathi News)

अशोक खरातने धार्मिक श्रद्धा, दैवी शक्ती आणि भविष्य सांगण्याच्या नावाखाली महिलांचा विश्वास संपादन करून त्यांचे शोषण केल्याचा आरोप आहे. मात्र या प्रकरणात वाद अधिक वाढण्याचे कारण म्हणजे चाकणकर यांनी खरातची पाद्यपूजा केल्याचा फोटो समोर आल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनीही तीव्र भूमिका घेतली आहे.
या प्रकरणावर आता माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा असलेल्या महाराष्ट्रात असे प्रकार घडणे अत्यंत निंदनीय आहे. “महिला आयोगाच्या प्रमुखांचा अशा प्रकरणाशी संबंध असल्याची चर्चा असेल, तर त्यांनी नैतिकदृष्ट्या राजीनामा द्यायला हवा. अन्यथा मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्यांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांना पदावरून हटवावे,” अशी ठाम मागणी त्यांनी केली.
संभाजीराजे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरजही अधोरेखित केली. “या मागे नेमकं कोण आहे, कोण-कोण त्या ठिकाणी जात होतं, हे सर्व उघड झाले पाहिजे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई आवश्यक आहे,” असे ते म्हणाले. महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा अत्यंत गंभीर असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाने कडक पावले उचलण्याचे आवाहन केले.







