T20 World Cup Final 2026 : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी (दि. 8) खेळल्या गेलेल्या T20 World Cup 2026 च्या अंतिम सामन्यात भारताने दमदार कामगिरी करत इतिहास रचला. कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने न्यूझीलंडवर 96 धावांनी दणदणीत विजय मिळवत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला. यापूर्वी भारताने 2007 मध्ये महेंद्र सिंह धोनी आणि 2024 मध्ये रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली हा किताब जिंकला होता.

सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी आक्रमक सुरुवात केली. दोघांनी मिळून केवळ 43 चेंडूत 98 धावांची सलामी भागीदारी करत संघाला भक्कम पाया दिला. अभिषेक शर्माने शानदार फलंदाजी करत 21 चेंडूत 52 धावा केल्या, ज्यामध्ये 6 चौकार आणि 3 षटकार होते.
यानंतर संजू सॅमसनने ईशान किशनसोबत दुसऱ्या विकेटसाठी 105 धावांची भागीदारी केली. सॅमसनने सलग तिसरे अर्धशतक झळकावत 46 चेंडूत 89 धावा केल्या, तर ईशान किशनने 25 चेंडूत 54 धावा केल्या. दोघेही 16 व्या षटकात बाद झाले, त्यामुळे सॅमसनचे शतक हुकले.
मध्यफळीत सूर्यकुमार यादव शून्यावर बाद झाला, तर हार्दिक पांड्याने 13 चेंडूत 18 धावा केल्या. शेवटी शिवम दुबेने आक्रमक खेळी करत केवळ 8 चेंडूत 26 धावा करत भारताची धावसंख्या 5 बाद 255 पर्यंत नेली. शेवटच्या 20 व्या षटकात भारताने 24 धावा काढल्या.
255 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 19 षटकांत 159 धावांवर आटोपला. भारताने अशा प्रकारे मोठ्या फरकाने विजय मिळवला.
विशेष म्हणजे T20 World Cup Final मध्ये 255 धावा ही आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या ठरली. भारताने यापूर्वी 2024 च्या फायनलमध्ये 176 धावा केल्या होत्या. टी-20 क्रिकेटमध्ये 250 पेक्षा जास्त धावा कधीकाळी दुर्मिळ मानल्या जात होत्या, मात्र आधुनिक क्रिकेटमध्ये हे विक्रम वेगाने मोडले जात आहेत.
या ऐतिहासिक विजयामुळे भारतीय क्रिकेटच्या यशात आणखी एक सुवर्ण अध्याय जोडला गेला असून देशभरात क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.







