ओमकार भोरडे

तळेगाव ढमढेरे: शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथे (Shirur News) बिबट्यांचा वावर दिवसेंदिवस (Pune News) वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी वेळोवेळी वनविभागाकडे पिंजरे लावण्याची मागणी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता नागरिकांचा संयम सुटू लागला असून “जीवितहानी झाल्यावरच पिंजरा लावणार का?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
गावात तीन प्राथमिक शाळा व एक हायस्कूल असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पालक चिंताग्रस्त आहेत. मुलांना शाळेत पाठवायलाही पालकांना असुरक्षित वाटू लागले आहे.
मागील काही दिवसांमध्ये आण्णापाटील चव्हाण यांच्या शेततळ्याजवळ तब्बल सात बिबट्यांचा कळप ग्रामस्थांना दिसून आला होता याशिवाय संपत जायकर यांच्या शेळीवर देखील बिबट्याने हल्ला केला होता, तसेच जायकर वस्ती, गावडे वस्ती, चव्हाण वस्ती या भागात अनेक जनावरे व कुत्र्यांना बिबट्यांनी ठार केले आहे. अगदी कालच, ४ नोव्हेंबर रोजी बिबट्याने चार शेळ्यांचा फडशा पाडला आहे.
ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे की, “पिंपरखेडमध्ये घटनेनंतर रस्ते बंद करावे लागले, तशी वेळ आमच्यावर आणू नका,” अशी तीव्र प्रतिक्रिया निमगाव म्हाळुंगीतील ग्रामस्थांनी नागरिकांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर सरपंच सचिन बबनराव चव्हाण, उपसरपंच प्रदीप पवार, ग्रामपंचायत अधिकारी गुलाब भाऊसाहेब नवले तसेच ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने पिंजरे लावून बिबटे पकडावेत अशी मागणी केली आहे.







