Satara News: सातारा: कराड येथे होळीच्या दिवशी घडलेल्या दुर्दैवी अपघातात अडीच वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. घराचे लोखंडी प्रवेशद्वार अंगावर कोसळल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कराड शहरातील भोई गल्ली येथे वल्लभ मुळे यांचा मासे पकडण्याच्या जाळी विक्रीचा व्यवसाय आहे. ते कुटुंबासह मलकापूर परिसरात राहतात. होळीच्या दिवशी रात्री ते पत्नी आणि मुलगा विघ्नेश याच्यासह घरी परतले. घरासमोर दुचाकी थांबवून विघ्नेश आत जात असताना अचानक लोखंडी प्रवेशद्वार त्याच्या अंगावर कोसळले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला.
प्रवेशद्वार पडल्याचे पाहताच वडील वल्लभ मुळे यांनी तातडीने मुलाला उचलले. शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला कराड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. ही बातमी ऐकताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि समाजातील लोकांनी रुग्णालयात गर्दी केली. मंगळवारी सकाळी कराड येथील वैकुंठ स्मशानभूमीत विघ्नेशवर अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबात आई-वडिलांसह एक मुलगी असून, मुलाच्या निधनामुळे घरात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर शोकाकुल झाला आहे.



