उरुळी कांचन, (पुणे): पुणे – सोलापूर महामार्गावरील (Pune-Solapur Highway) उरुळी कांचन परिसरात 7 ते 8 अपघात झाले आहेत. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. उरुळी कांचन हद्दीतील सोनाई हॉटेल परिसरात, कोरेगाव मूळ परिसरातील हॉटेल शिवशंकर व कोरेगाव मूळ चौकात असे अपघात झाले आहेत. या अपघातामुळे परीसरात प्रचंड वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाली होती.

रविवारी रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे-सोलापूर महामार्गासह उरुळी कांचन परिसरातील अनेक ठिकाण अक्षरशः जलमय (Heavy Rain) झाले आहेत. तसेच ढगफुटी सदृश पाऊसामुळे महामार्गाला नद्याचे स्वरूप आले होते. त्यामुळे एक लेन बंद पडण्याच्या मार्गावर आहे. इरिगेशन कॉलनी, हरणा कॉम्प्लेक्स,देवकर पेट्रोल पंप, या ठिकाणांचा परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
महामार्गावर पाणी साचल्याने दोन्ही बाजूने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे रात्रीपासून या भागात प्रचंड वाहतूक कोंडी आहे. महामार्गाच्या अनेक ठिकाणी दोन्ही बाजूंनी पाणी ओसंडून वाहत असल्याने महामार्गावर शेकडो वाहने अडकली आहेत. काही गाड्या पाण्यात बंद पडल्या आहेत. रात्रीपासून सकाळपर्यंत वाहतूक पूर्णपणे ठप्प राहिल्याने पुणे-सोलापूर मार्गावरील प्रवासी व वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली आहे. तसेच प्रवासी तासन्तास गाड्यांमध्ये अडकले असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला आहे. उरुळी कांचन पासून एकूण दहा किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
दरम्यान, महामार्गावर पाणी साचल्याने गाड्या घासल्या जात आहेत. यामुळे वाहनचालक महामार्गावरच हुज्जत घालीत असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. तसेच मोठे कंटेनर व अवजड वाहने रस्त्यावरच गाड्या बंद पडल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. हि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे, पोलीस हवालदार निलेश जाधव, दीपक यादव, महिला कर्मचारी पूजा तानवडे, सारिका गवारे यांनी रात्रभर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न केले.







