Pune Mumbai Expressway : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघाताने अवघा एक्सप्रेस वे तब्बल दीड दिवस ठप्प केला. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ज्वलनशील प्रोपलेन गॅस वाहून नेणारा टँकर थेट बोगद्याच्या तोंडाशी उलटला. सुदैवाने मोठा स्फोट टळला, पण गॅसगळतीमुळे परिस्थिती अतिशय धोकादायक बनली. (Pune Mumbai Expressway)

सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रशासनाने तात्काळ दोन्ही बाजूंची वाहतूक बंद केली. परिणामी एक्सप्रेस वे आणि जुना मुंबई–पुणे महामार्ग या दोन्ही ठिकाणी २२ ते २५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. आडोशी बोगद्यापासून थेट बऊर गावाच्या हद्दीपर्यंत गाड्या रेंगाळत होत्या. हजारो प्रवासी, लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण रस्त्यावर तासन्तास अडकले. अनेकांचे फ्लाइट चुकले, तर मुंबईकडे जाणारा भाजीपाला आणि शेतमाल अडकल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
मंगळवारी सायंकाळी सुमारे पाच वाजता अपघात झाल्यानंतर गॅसगळती थांबवण्यासाठी रात्री तज्ज्ञ पथक दाखल झाले. मात्र गॅस अत्यंत ज्वलनशील असल्याने काम सावकाश करावं लागलं. बुधवारी दुपारी दुसऱ्या टँकरमध्ये गॅस भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि रात्री उशिरा टँकर बाजूला करून एका लेनवरून वाहतूक सुरू करण्यात आली.
या संपूर्ण घटनेचा सखोल अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला जाणार असल्याची माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. “सामान्यतः अशा घटनांवर ८ तासांत प्रतिसाद दिला जातो. मात्र यावेळी गॅस अतिशय धोकादायक असल्याने वेळ लागला. पुढे असे अपघात टाळण्यासाठी एसओपी तयार करणार आहोत, चालकांसाठी विशेष कार्यशाळाही घेतली जाईल,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
हा अपघात केवळ एक वाहन उलटल्याची घटना नाही, तर द्रुतगती मार्गावरील सुरक्षाव्यवस्था, धोकादायक रसायन वाहतूक आणि आपत्कालीन व्यवस्थापन यावर गंभीर प्रश्न उपस्थित करणारा आहे.







