Uruli Kanchan News: उरुळी कांचन, ता. 22 : वाहन चालकाला कागदपतत्रे विचारत कारवाईची धमकी द्यायची. त्यामधूनच चलनाच्या नावाखाली वसूली करण्याचा प्रकार- उरुळी कांचन या राज्य मार्गावर महामार्ग राज्य पोलिसांकडून (एम. एस.पी) सुरू असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

शिंदवणे (ता. हवेली) घाट परिसरात महामार्ग राज्य पोलीस घाटाच्या आडोशाला थांबून वाहने रस्त्यातच अडवतात. याकामी तीन पोलिस दंड वसुली करत आहेत. त्यामुळे येथील परिसरात मोठी वाहतूक कोंडी वाढत असून मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात परराज्यातील वाहनांची एन्ट्री करताच महामार्ग पोलिसांकडून या ना त्या कारणावरून वसुली केली जात आहे. महामार्ग पोलिसांच्या या वसुलीचा सर्वाधिक फटका जेजुरी, सासवड, परिसरातून देवदर्शनासाठी येणाऱ्या व जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांनाही बसतो आहे. विशेषतः जेजुरीला जाणाऱ्या भाविकांची वाहने अडवून महामार्ग पोलिसांकडून वसुली केली जात असल्याने या भाविकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
भाविकांच्या प्रवासी वाहनांना अडवून कागदपत्रांसह प्रवासी संख्या, टपावर प्रवासी सामान असे वा अन्य कोणत्याही कारणावरून प्रवासी वाहनांची अडवणूक केली जाते. त्यामुळे आसपासच्या परिसरातील देवदर्शनासाठी येणारे भाविक त्रस्त झाले आहेत. घाटातील वाहतूक कोंडी व नियोजन करण्याऐवजी वाहने आडवून त्यांच्याकडून पैसे घेत असल्याचा आरोप नागरिक करू लागले आहेत. या प्रकारामुळे परिसरात पोलिसांविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.
शिंदवणे घाट व परिसरात वारंवार मोठे अपघात होत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे पोलिसांनी याठिकाणी फक्त वाहतूकीचे नियोजन करणे, गरजेचे आहे. नगर रस्त्याला जाण्यासाठी जवळचा रस्ता म्हणून जेजुरी-शिंडवणे राज्य मार्गाकडे पहिले जाते. नगर रस्त्यावरील मोठमोठ्या एमआयडीसी व कंपन्यात येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी असते. तसेच भाविकांच्याही गाड्यांची मोठी गर्दी या ठिकाणी असते. मात्र महामार्ग पोलिसांकडून आर्थिक वसुली केली जात असल्याचे काही चालकांनी सांगितले.
दरम्यान, जिल्हा ग्रामीण वाहतूक पोलिसांच्या सीमारेषा ठरलेल्या असतानाही महामार्ग व राज्य महामार्गांवर महामार्ग पोलिसांच्या पथकांकडून टेहेळणी करून गाड्या अडवीत असल्याचा व्हिडीओ ‘पुणे प्राईम न्यूज’च्या हाती लागला आहे. दळण वळणाच्या सुविधेकरिता तयार झालेला हा मार्ग पोलिसांकरिता कमाईचे साधन ठरत आहे. येथे कार्यरत असलेले पोलीस या वाहन चालकांकडून चालानच्या नावाखाली चांगलीच वसुली करीत असल्याचा आरोप नागरिक करू लागले आहेत.






