पुणे: पुणे जिल्ह्यात सध्या पालखी सोहळ्यामुळे उत्साही वातावरण पाहायला मिळत आहे. लाखो भक्तांच्या उपस्थितीने वारीचा मार्ग दुमदुमून गेला आहे. मात्र, या भक्तीमय प्रवासात काही चोरट्यांनी सक्रिय होत भाविकांना लक्ष्य केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. गर्दीचा फायदा घेत भक्तांना लुटणाऱ्या या टोळीमुळे वारकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

चोरटे वारकऱ्यांच्या अंगावर खाज येणारी पावडर टाकतात आणि मग त्यांच्याकडे असलेले दागिने, रोख रक्कम घेऊन पसार होतात. दरम्यान, अनेकांचे पैसे, दागिने चोरला गेल्याचे समोर आले आहे.

रुक्मिणीबाई बोबडे या अंघोळीला गेल्या असता त्यांच्या सामानाची पाहणी करत, चोरट्यांनी कपडे, मोबाईल आणि रोख रकमेवर डल्ला मारला. पालखी मार्गावर अशा चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढल्याने तक्रारींचा ओघ वाढला आहे. समर्थ, शिवाजीनगर आणि स्वारगेट पोलीस ठाण्यात या संदर्भात नोंद झाली असून पोलीस आता सतर्क झाले आहेत.
वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी वारकऱ्यांना विशेष सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. वारीमध्ये प्रवास करताना आपली मौल्यवान वस्तू, मोबाईल आणि रोकड नेहमी स्वतःच्या जवळ ठेवावी. गर्दीमध्ये कोणी संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलिसांना किंवा सुरक्षा रक्षकांना माहिती द्यावी, अशी विनंती प्रशासनाने केली आहे.







