डॉ. अशोक बालगुडे

पुणे : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरी उपबाजार ते कवडीपाट टोलनाका या मार्गाची अक्षरशः दैना झाली आहे. डांबरी रस्ता उखडून खडी सर्वत्र पसरली असून, स्वच्छता विभागाकडून वारंवार झाडल्यानंतर रस्त्यावर गुडघ्याएवढे खोल खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी चारी निर्माण झाल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे दररोज किरकोळ अपघातांपासून गंभीर दुर्घटनांपर्यंतची मालिका सुरू असतानाही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या आश्वासनांपलीकडे प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही.

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर या मार्गाची दुरवस्था प्रकर्षाने समोर आली होती. देहू-आळंदीहून पालखी सोहळा सुरू झाल्यानंतर मुसळधार पावसाने रस्त्याची अवस्था आणखी बिकट केली. त्यानंतर पावसाने उघडीप दिली. त्यामुळे रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची संधी प्रशासनाकडे होती. पालखी पंढरपूरकडे जाण्यापूर्वी काम पूर्ण केले जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, पालखी पंढरपूरला पोहोचली, आषाढी वारीही संपली आणि वारकरी आपापल्या घरी परतले; तरी रस्त्याच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही.

बैठका सुरू, कामाचा पत्ता नाही!
रस्त्याची दुरवस्था वाहनचालकांच्या जिवावर उठली असताना संबंधित यंत्रणांकडून मात्र बैठका, पत्रव्यवहार आणि चर्चांचे सत्र सुरू आहे. आमदार-खासदारांनी संबंधित विभागाला पत्र दिल्याचे सांगितले जाते. मात्र, पत्र पाठविणे आणि प्रत्यक्ष रस्ता दुरुस्त करणे यातला फरक प्रशासनाने समजून घेण्याची गरज आहे. नागरिकांना पत्रांची नाही, सुरक्षित रस्त्याची गरज आहे.
एमएसआयडीसीचे उपअभियंता संजीव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, वरिष्ठांशी चर्चा करून रस्त्याचे काम पालखीच्या अगोदर केले जाईल, असे त्यांनी सांगितले. मात्र, पालखी तर पंढरपूरला जाऊन परतली आहे. त्यामुळे आता वाहनचालकांचा संतप्त सवाल आहे—पुढील वर्षीची आषाढी वारी सुरू होण्यापूर्वी तरी हा रस्ता होणार का?
खड्ड्यांमध्ये शोधायचा विकास?
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून दररोज हजारो वाहने धावतात. पुणे-सोलापूर महामार्गावरील हा महत्त्वाचा पट्टा असूनही त्याची अशी अवस्था होणे ही केवळ प्रशासकीय दिरंगाई नाही, तर सार्वजनिक सुरक्षिततेकडे केलेले गंभीर दुर्लक्ष आहे. खडी पसरलेल्या रस्त्यावर दुचाकी घसरून पडण्याचा धोका वाढला आहे. चारचाकी वाहनांना खड्डे चुकविताना अचानक लेन बदलावी लागते. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांशी धडक होण्याची शक्यता कायम आहे.
रस्ता खराब झाल्यानंतर त्यावर माती-खडी टाकणे, ती झाडणे आणि पुन्हा खड्डे पडणे, असा प्रकार सुरू आहे. रस्त्याची डागडुजी करण्याऐवजी प्रशासन जणू खड्ड्यांचीच देखभाल करीत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे.
गजानन विधाते, बाळासाहेब विधाते, मयूर फडतरे, गोविंद कुंजीर, प्रा. अरुण झांबरे आणि अशोक माने यांनी या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने एकमेकांकडे बोट दाखविण्याऐवजी जबाबदारी निश्चित करून तातडीने काम सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली. आश्वासनांनी खड्डे बुजत नाहीत आणि पत्रव्यवहाराने अपघात थांबत नाहीत. रस्ता कधी करणार, याची तारीख आता नागरिकांना हवी आहे; पुन्हा आश्वासन नको. आणखी एखादा जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होण्याची वाट पाहणार का? “रस्ता दुरुस्त करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना वारंवार विनवण्या करण्यापेक्षा, आता अपघातात मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या दहाव्यालाच त्यांनी यावे आणि त्यांना श्रद्धांजली वाहावी; कदाचित तेव्हाच या रस्त्याच्या दुरवस्थेची त्यांना जाणीव होईल,” अशी संतप्त आणि उपरोधिक टिप्पणी वाहनचालकांनी केली.






