पुणे: सध्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येत असून यवत ग्रामपंचायत हद्दीत मात्र कचऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे तर कचरा संकलन करणाऱ्या घंटा गाडीचे वेळापत्रक नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यवत ग्रामपंचायतीचे कचरा उचलण्याचे नियोजन कोलमडले असून यवत परिसरात दररोज कचरा उचलला जात नसून कधी 2 दिवसांनी तर 3 दिवसांनी कचरा उचलला जात असल्याने गाडी येत नसल्याने कचऱ्याचे गावाच्या विविध भागात ढीग साचले आहेत.

यवत हे पुणे सोलापूर महामार्गावरील मोठे गाव असून गावातील कचरा गोळा करण्यासाठी घंटा गाडीचे वेळापत्रक नसल्याने गाडी कधी येईल याची शाश्वती नसल्याने नोकरदार वर्ग व बाहेर जाणारे ग्रामस्थ हे आपला कचरा काहीच ठिकाणी असलेल्या कचराकुंडीत तर कधी इतरत्र टाकतात सध्या रस्त्याच्या बाजूला कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
यवत ग्रामपंचायतीचे कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे भिजत घोंगडे अनेक वर्षांपासून कायम आहे. प्रकल्पाच्या कामास गती मिळत नसल्याने कचरा उचलण्याचे नियोजनही कोलमडले आहे. परिणामी नगरीकरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. गावातील कचरा उचलून तो तलाठी कार्यालय शेजारी असलेल्या खाणीत टाकण्यात येतो ही खाण पूर्ण भरली असून हा कचरा रस्त्यावर व परिसरात पसरला जात आहे.
मागील अनेक वर्षांपासून कचरा डेपोतील कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया होत नाही , अनेक वर्षांपासून हा कचरा एकाच जागेवर असल्याने प्रदूषणाचा व आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला असून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सक्षम यंत्रणाच ग्रामपंचायतीकडे उपलब्ध नाही.
कचरा प्रकल्प सुरू करून कचरा उचलण्याची यंत्रणा सक्षम करावी, तरच गावातील कचऱ्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल अशी मागणी नागरिक करत आहेत.
घंटा गाडीचे वेळापत्रकच नाही
यवत ग्रामपंचायत मार्फत गेल्या अनेक वर्षांपासून कचरा गोळा करण्यासाठी घंटा गाडीची वापर केला जात असून घंटा गाडीचे वेळापत्रकच नाही ही मोठी शोकांतिका आहे. घंटा गाडी कधी २ तर कधी ३ दिवसांनी , कधी सकाळी तर कधी संध्याकाळी गाडी येते असून नोकरदार व ग्रामस्थांना आपली कामे सोडून गाडीची वाट पाहावी लागते परंतु गाडी येईल याची कोणतीही खात्री देता येत नसल्याने कचरा रस्त्यावर टाकला जात असल्याने चित्र पहायला मिळत आहे .
नागरिकांना हव्यात ठोस उपाययोजना
गावतील अनेक भागात घंटागाड्या जात नाहीत, तसेच कचराकुंड्याही नाहीत. त्यामुळे कचरा टाकायचा तरी कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने प्रत्येक घरापर्यंत घंटागाडी वेळेवर पोहोचेल, तसेच आवश्यक ठिकाणी कचराकुंडी ठेवणे अशी व्यवस्था करणे गरजेचे आहे तर सुविधा उपलब्ध करूनही इतर ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर सी.सी. टीव्ही च्या साह्याने दंड आकारणी करणे अशा ठोस उपाययोजना झाल्या, तर नागरिक उघड्यावर कचरा टाकणार नाही.
घंटा गाडीचे वेळापत्रक नसून लवकरच याबाबत घंटा गाडीचे वेळापत्रक जाहीर केले जाईल व कचरा संकलनासाठी योग्य ते उपाय योजना करण्यात येईल
-सरपंच – समीर दोरगेकचरा प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामपंचायत उपाययोजना करत असून घंटा गाडीचे योग्य नियोजन व वेळापत्रक लवकरच तयार केले जाईल.
-बालाजी सरवदे (ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत, यवत)







