लोणावळा: लोणावळ्यातील आई एकवीरा देवीच्या गडावर दरवर्षी चैत्र महिन्यात (Lonavala News) भरत असलेली यात्रा आग्री-कोळी समाजासाठी अत्यंत श्रद्धेची मानली जाते. हजारो भाविक या काळात (Ekvira Devi Temple) गडावर दर्शनासाठी येतात आणि पालख्यांच्या माध्यमातून देवीची पूजा-अर्चा करतात. यंदाही ही यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली, मात्र शेवटच्या टप्प्यात दोन गटांतील वादामुळे वातावरण बिघडले. (Latest Marathi News)

माहितीनुसार, पालख्यांच्या मान-सन्मानावरून सुरू झालेला वाद हळूहळू उग्र झाला. “कोणाची पालखी मोठी” या किरकोळ वाटणाऱ्या मुद्द्यावरून दोन्ही गटांमध्ये तणाव वाढत गेला आणि त्याचे रूपांतर थेट दगडफेकीत झाले. पहिल्या दिवशी झालेल्या वादानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा संघर्ष पेटला. काही अतिरेकी भाविकांनी परिसरातील गवताला आग लावल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली.
या प्रकारामुळे यात्रेचा धार्मिक आणि शांततेचा माहोल बिघडला. अनेक भाविकांना भीतीचे वातावरण अनुभवावे लागले. विशेष म्हणजे, सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या हव्यासातून काहींनी या वादाला हवा दिल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. त्यामुळे धार्मिक कार्यक्रमांमध्ये वाढत चाललेली दिखाऊ स्पर्धा आणि अहंकाराची प्रवृत्ती पुन्हा एकदा समोर आली आहे.
देवस्थान ट्रस्टने या घटनेपासून स्वतःला दूर ठेवत हा वाद पूर्णपणे भाविकांमधील असल्याचे स्पष्ट केले आहे. दोन्ही गटांशी चर्चा करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक नियमावली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनीही परिस्थिती नियंत्रणात आणत संबंधितांवर गुन्हे नोंदवले आहेत.







