पुणे: आखाती देशांमध्ये भडकलेल्या (Pune News) युद्धाच्या वणव्यामुळे सध्या जागतिक स्तरावर इंधन आणि गॅस पुरवठ्याची साखळी विस्कळीत झाली आहे. याचे पडसाद पुण्यातही उमटताना दिसत असून, गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे. गॅस संपेल या भीतीने अनेक नागरिक एजन्सीबाहेर रांगा लावत असतानाच, केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे.

आयात विस्कळीत झाल्यामुळे गॅस कंपन्यांकडे असलेला साठा मर्यादित झाला आहे. पुण्यात हॉटेल आणि उद्योगांसाठी वापरल्या जाणाऱ्या व्यावसायिक (Commercial) सिलिंडरचा पुरवठा कमी झाल्याने खळबळ उडाली होती. हीच परिस्थिती घरगुती सिलिंडरबाबतही ओढवेल, या भीतीने नागरिक साठवणूक करण्याचा प्रयत्न करत होते.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले की, गॅसचा साठा मर्यादित असल्याने सरकारने ‘घरगुती ग्राहक’ हीच आपली प्राथमिकता ठेवली आहे. जोपर्यंत परिस्थिती सामान्य होत नाही, तोपर्यंत व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर काही मर्यादा असतील, मात्र घरगुती वापराच्या गॅसचा (LPG) पुरवठा 100 टक्के सुरळीत राहील. “सर्वसामान्यांच्या घरातील चूल विझू नये, ही सरकारची जबाबदारी आहे,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
जेव्हा जेव्हा टंचाईची अफवा पसरते, तेव्हा साठेबाजी आणि काळाबाजार वाढतो. काही गॅस एजन्सी या परिस्थितीचा फायदा घेऊन ग्राहकांची लूट करण्याची शक्यता असते. यावर मंत्र्यांनी कडक इशारा दिला आहे. जर कोणत्याही वितरकाने घरगुती गॅस देण्यास टाळाटाळ केली किंवा चढ्या दराने विक्री केली, तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.







