पुणे: गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या पुरंदर (Pune News) आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला अखेर गती मिळत आहे. जमिनीच्या बदल्यात मोबदला कधी मिळणार, या विवंचनेत असलेल्या पुरंदरमधील सात गावांतील शेतकऱ्यांसाठी ही बातमी मोठा दिलासा देणारी ठरली आहे. राज्य सरकारने या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी तब्बल 6 हजार कोटी रुपयांच्या कर्जाला मंजुरी दिली असून, आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पुणे शहराच्या वाढत्या विस्तारामुळे लोहगाव विमानतळावर प्रचंड ताण येत आहे. याला पर्याय म्हणून पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र, 7 गावांमधील सुमारे 3000 एकर जमिनीच्या संपादनावरून हा प्रकल्प रखडला होता. 96 टक्के शेतकऱ्यांनी संमती देऊनही ‘निधी’अभावी आणि निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे प्रशासनाचे हात बांधलेले होते. आता आचारसंहिता संपताच सरकारने तत्परता दाखवत निधीची तरतूद केली आहे.
या प्रकल्पासाठी 6 हजार कोटींचे हे कर्ज एका राष्ट्रीयीकृत बँकेकडून घेतले जाणार असून, जिल्हा प्रशासनाने त्याची सर्व पूर्वतयारी पूर्ण केली आहे. रिंगरोडच्या कामात शेतकऱ्यांना चेक दिले गेले होते, ज्यामुळे बँकांमध्ये हेलपाटे मारावे लागले होते. मात्र, पुरंदर विमानतळासाठीचा मोबदला थेट आरटीजीएस (RTGS) द्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल.







