Pune News: पुणे: राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचे अध्यक्ष आणि इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्या अध्यक्षतेखालील शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने आवश्यक गाळप परवाना मिळण्यापूर्वीच ऊस गाळप सुरू केल्याप्रकरणी 11 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. महाराष्ट्र साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी ही दंडाची रक्कम 7 दिवसांच्या आत भरण्याचे आदेश दिले आहेत.

साखर आयुक्तालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यावर 2.32 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील रायगाव शुगर अँड पॉवर या खाजगी साखर कारखान्यालाही सुमारे 40 लाख रुपयांचा दंड लावण्यात आला आहे.
राज्यात ऊस गाळप हंगाम अधिकृतपणे 1 नोव्हेंबरपासून सुरू होतो. त्यापूर्वी प्रत्येक साखर कारखान्याने महाराष्ट्र साखर आयुक्तालयाकडून गाळप परवाना घेणे बंधनकारक आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रांसह संपूर्ण प्रस्ताव सादर करणे आवश्यक असते, असे आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.
इंदापूर येथील शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने 20 ऑक्टोबर रोजी ऑनलाइन प्रस्ताव सादर केला होता. मात्र, परवाना मंजूर होण्यापूर्वीच कारखान्याने ऊस गाळप सुरू केले. या कारखान्याने एकूण 2,24,299 मेट्रिक टन ऊस गाळप केल्याने प्रति टन 500 रुपये दराने 11,21,49,500 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
पंढरपूर येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याने परवान्याआधी 46,447 मेट्रिक टन ऊस गाळप केल्यामुळे 2,32,23,500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर रायगाव शुगर अँड पॉवर कारखान्याने 7,980 मेट्रिक टन ऊस गाळप केल्याबद्दल 39,90,380 रुपयांचा दंड लावण्यात आला आहे.
साखर आयुक्तालयाने सांगितले की, परवाना मिळण्यापूर्वी ऊस गाळप झाल्यास शेतकऱ्यांना योग्य आणि किफायतशीर दर मिळण्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा कारखान्यांवर कठोर कारवाई करण्यात येत असून, पुढील काळातही नियमभंग करणाऱ्यांवर लक्ष ठेवले जाणार आहे.







