पुणे: पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 15 मधील मांजरी केशवनगर आणि साडेसतरानळी परिसरात नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत मोठी मागणी पुढे आली आहे. वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे आणि नागरीकरणामुळे या भागात आरोग्य, शिक्षण, सुरक्षा आणि मालकी हक्काशी संबंधित प्रश्न तीव्र झाले असून, स्थानिकांनी प्रशासनाकडे ठोस उपाययोजनांची मागणी केली आहे.

साडेसतरानळी ग्रामपंचायत कार्यालयाजवळील सुमारे 5 एकर एरिकेशन विभागाची जागा सध्या मोकळी असून, ती अतिक्रमणाच्या धोक्यात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ही जागा वेळेत ताब्यात घेऊन त्यावर जनकल्याणकारी प्रकल्प उभारावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रस्तावित प्रकल्पांमध्ये अत्याधुनिक सरकारी रुग्णालय, ई-लर्निंग इंग्लिश माध्यम शाळा, क्रीडा संकुल, प्रशासनिक भवन, विठ्ठल-रुक्माई मंदिर आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र यांचा समावेश आहे. या सुविधा उभारल्यास परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, परिसरात वाढत असलेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा हा देखील मोठा मुद्दा बनला आहे. कोयता गँगसारख्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी स्वतंत्र पोलीस चौकी उभारण्याची मागणी जोर धरत आहे.
या भागातील जमीन मालकीचा प्रश्नही तितकाच गंभीर आहे. सर्वे नंबर 206 गोसावी येथील रहिवासी गेल्या 200 ते 300 वर्षांपासून येथे वास्तव्यास असून, त्यांनी नियमितपणे करही भरले आहेत. तरीही त्यांच्या घरांची अधिकृत नोंद सातबारा उताऱ्यावर नाही. त्यामुळे गायरान जमीन गावठाण म्हणून घोषित करून प्रत्येक घरधारकाला मालमत्ता हक्क देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच दांगट वस्तीतील रहिवाशांचेही नाव प्रॉपर्टी कार्डावर नोंदवण्याची मागणी आहे.
क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अमोल तुपे आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी या सर्व मागण्यांसाठी प्रशासनाला निवेदन दिले आहे. आता प्रशासन या प्रश्नांकडे कितपत गांभीर्याने लक्ष देते आणि प्रत्यक्षात किती लवकर निर्णय घेतो, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.







