पुणे: पुणे आणि मुंबई (Missing Link) दरम्यानचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९३ टक्के काम आता पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या देखरेखीखाली सुरू असलेला हा मार्ग मे २०२६ पर्यंत सर्वसामान्यांच्या वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. या नवीन प्रकल्पामुळे घाटातील १३.३ किलोमीटरचे अंतर कमी होणार असून प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे.

या प्रकल्पामध्ये १८१ मीटर उंचीचा देशातील सर्वात उंच दरीपूल उभारण्याचे मोठे आव्हान प्रशासनाने पेलले आहे. २०१९ मध्ये या कामाला सुरुवात झाली होती, ज्यामध्ये १.६८ किमी आणि ८.८७ किमी लांबीचे दोन महाकाय बोगदे तयार करण्यात आले आहेत. सध्या पुलाचे दोन्ही मार्ग जोडण्याचे आणि केबल बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे. बोगद्यामध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आधुनिक अलार्म यंत्रणा देखील बसवण्यात आली आहे.
पुणे किंवा सातारा बाजूने येणारे प्रवासी जेएनपीए रोडचा वापर करून पनवेल शहरात न शिरता थेट विमानतळापर्यंत पोहोचू शकतील. या खास मार्गामुळे पुणे ते नवी मुंबई विमानतळ हा प्रवास अवघ्या 2 तास 15 मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. तसेच खोपोली एक्झिटपासून कुसगावपर्यंतची मिसिंग लिंक तयार झाल्यामुळे प्रवासाचा वेग वाढणार असून प्रवाशांचा प्रवास पूर्वीपेक्षा अधिक सुखकर आणि सुरक्षित होणार आहे.







