पुणे: पुणे सत्र न्यायालयाने ( pune News) नुकताच एका बलात्कार प्रकरणात महत्त्वपूर्ण निकाल दिला असून, 23 वर्षीय तरुणाला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणाच्या निमित्ताने ‘लग्नाचे आमिष’ आणि ‘परस्पर संमती’ यांमधील पुसट रेषेवर न्यायालयाने परखड भाष्य केले आहे.

नेमके प्रकरण काय?
28 वर्षीय विवाहित महिला, जिला नऊ वर्षांची मुलगी आहे, तिने रितेश सुनील जाधव (23) या तरुणाविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली होती. गेल्या 8 महिन्यांपासून लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने वारंवार शारीरिक संबंध ठेवले, असा तिचा आरोप होता. दरम्यान, अटकेच्या भीतीने रितेशने न्यायालयात धाव घेतली.
न्यायालयाने काय म्हटले?
फिर्यादी महिला ही विवाहित आणि प्रौढ आहे. एक 23 वर्षांचा तरुण आपल्याला लग्नाचे आमिष दाखवत आहे आणि त्यावर ही महिला विश्वास ठेवत आहे, हे प्रथमदर्शनी तर्कसंगत वाटत नाही. जर एखादी व्यक्ती परिणामांची जाणीव असताना वारंवार शारीरिक संबंध ठेवत असेल, तर त्याला केवळ ‘आमिष’ असे संबोधून बलात्काराचा गुन्हा ठरवता येणार नाही.
अनेकदा प्रेमसंबंधांत दुरावा आल्यावर किंवा वाद झाल्यावर बलात्काराची तक्रार केली जाते. या निकालातून न्यायालयाने हे स्पष्ट केले की, कायद्याचा वापर करताना दोन्ही बाजूंचा विचार करणे गरजेचे आहे. रितेशच्या वतीने ॲड. आकाश सुधीर चव्हाण यांनी प्रभावी युक्तिवाद केला की, हे संबंध पूर्णपणे परस्पर संमतीने होते आणि तक्रार केवळ वादातून सूड घेण्यासाठी केली गेली होती.







