लोणी काळभोर, ता. 27 : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढत्या पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या हवेली तालुक्यातील गावांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, नादुरुस्त अवस्थेत बंद पडलेले हातपंप तातडीने दुरुस्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहेत. अशी माहिती हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज हिरामण काकडे यांनी दिली आहे.

तालुक्यातील अनेक गावांमध्ये भूगर्भातील पाण्याची पातळी घसरल्याने पाणीटंचाई तीव्र झाली आहे. काही ठिकाणी हातपंपांचे पाणी आटले असले तरी अनेक ठिकाणी पाणीसाठा उपलब्ध असूनही हातपंप नादुरुस्त असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वर्षानुवर्षे देखभाल न झाल्यामुळे अनेक हातपंप गंजून निकामी झाले आहेत.
या परिस्थितीची दखल घेत हवेली पंचायत समितीच्या वतीने बंद पडलेल्या हातपंपांची तातडीने दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी तालुक्यातील सर्व गावांतील व वाड्या-वस्त्यांवरील बंद हातपंपांची यादी संकलित करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.
सभापती युवराज काकडे यांनी ग्रामस्थ व स्थानिक पदाधिकाऱ्यांना आवाहन करताना सांगितले की, “ज्या ठिकाणी हातपंपांमध्ये पाणी असूनही ते केवळ तांत्रिक बिघाडामुळे बंद आहेत, अशा हातपंपांची माहिती त्वरित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांकडे द्यावी. प्राप्त यादीच्या आधारे प्राधान्याने दुरुस्ती करण्यात येईल.”
गेल्या काही वर्षांत वाड्या-वस्त्यांवर टप्प्याटप्प्याने विंधन विहिरी खोदून त्यावर हातपंप बसविण्यात आले होते. सुरुवातीला हे हातपंप गावांसाठी मोठा आधार ठरले; मात्र कालांतराने देखभाल अभावी अनेक हातपंप बंद पडले. आता या सर्व हातपंपांना पुन्हा कार्यान्वित करण्यावर पंचायत समितीने भर दिला आहे.
पाणीटंचाईतून गावांना मिळणार दिलासा
हातपंप सुरू झाल्यास टँकरवरील अवलंबित्व कमी होऊन ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेत वाढ होण्यापूर्वीच ही मोहीम पूर्ण करण्याचा पंचायत समितीचा प्रयत्न असल्याची माहिती प्रशासनाने दिली. या निर्णयामुळे हवेली तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून, बंद हातपंप पुन्हा सुरू होण्याची ग्रामस्थांना प्रतीक्षा लागली आहे.







