Crime News : ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री मटण पार्टीचा बेत आखून शेतकऱ्यांची शेळी-बोकडे चोरणाऱ्या दोन दुचाकीस्वार चोरट्यांना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून पाच बोकड, एक शेळी आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण सुमारे १ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पशुधन चोरीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गणेश कैलास ब्राम्हणे (वय २१) आणि सुनील अण्णाभाऊ माळी (वय २४, दोघे रा. गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या विरोधात रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शिरूर तालुक्यातील बाभुळसर खुर्द, करंजावणे, गणेगाव खालसा, कर्डिलवाडी आणि वाघाळे परिसरात शेळी-बोकड चोरीच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी बाभुळसर खुर्द येथील शेतकरी माणिक रामभाऊ काळे यांनी तक्रार दिली होती. याच प्रकारचे एकूण पाच गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला.
तांत्रिक तपास आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणवाडी येथील दोन तरुण दुचाकीवरून येऊन ही चोरी करत असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतलं. चौकशीत त्यांनी पाच ठिकाणी पशुधन चोरी केल्याची कबुली दिली.
चोरीस गेलेली शेळी आणि बोकडे संबंधित शेतकऱ्यांना परत देण्यात आले. कष्टाने पाळलेली जनावरे सुरक्षित परत मिळाल्याने शेतकऱ्यांनी पोलिसांचे आभार मानले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्यासह अविनाश थोरात, दत्तात्रय शिंदे, उमेश कुतवळ, योगेश गुंड, किशोर शिवणकर आणि नितीन भोस यांच्या पथकाने केली.







