भिगवण: इंदापूर तालुक्यातील भिगवण (Bhigwan News) येथील ज्या कथित अपहरण प्रकरणामुळे संपूर्ण पुणे जिल्हा हादरला होता, त्या प्रकरणाचा शेवट एखाद्या फिल्मी क्लायमॅक्सप्रमाणे झाला आहे. भरदिवसा आई-भावाच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून मुलीला पळवून नेल्याचा दावा करणाऱ्या तक्रारीत आता मोठी तफावत आढळली असून, संबंधित तरुणी गुरुवारी मध्यरात्री स्वतःहून बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर होत जबाब नोंदवला आहे.

मंगळवारी दुपारी 4 च्या सुमारास ही 21 वर्षीय तरुणी लग्नाचे दागिने खरेदी करून घरी परतत होती. त्यावेळी जहीर शेख आणि आयान शेख या दोन भावांनी तिला टेम्पोतून पळवून नेल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी दिली होती. तक्रारीत म्हटले होते की, आरोपींनी आई-भावाला मारहाण केली आणि त्यांच्या डोळ्यांत मिरचीपूड फेकली. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने चौकशी सुरु केली.
सत्य काय?
गुरुवारी मध्यरात्री 1.30 च्या सुमारास तरुणी प्रियकरासह बारामती पोलीस ठाण्यात दाखल झाली आणि तिने दिलेला जबाब धक्कादायक आहे. तरुणीच्या म्हणण्यानुसार:
ती स्वतःच्या मर्जीने आणि नियोजित प्लॅननुसार घरून निघून गेली होती. तक्रारीत केलेला मिरचीपुडीचा दावा खोटा असून, मेडिकल रिपोर्टमध्येही डोळ्यात चटणी टाकल्याचे कोणतेही अंश आढळलेले नाहीत. तिने भावाच्या मोबाईलवरूनच प्रियकराला शासकीय विश्रामगृहाजवळ बोलावले आणि तिथून ती त्याच्यासोबत निघून गेली.
पळून गेल्यानंतर हे जोडपे श्रीगोंदा, अहिल्यानगर, शिक्रापूर, पुणे, सासवडमार्गे महाबळेश्वरला गेले होते. तिथून थेट पोलीस ठाणे गाठले. सध्या तरुणी बारामती पोलिसांच्या ताब्यात असून, मुलाला पोलिसांनी पहाटे खासगी गाडीतून अज्ञात स्थळी नेले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मुलीच्या घरच्यांनी तिला स्वीकारण्यास किंवा पोलीस ठाण्यात येण्यास नकार दिल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, पोलिस काय कारवाई करत आहेत? याबद्दल कमालीची गुप्तता ठेवण्यात आली आहे.







