पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा तीव्र भूमिका घेतली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील विटा येथे दौऱ्याच्या सांगता सभेत बोलताना त्यांनी सरकारला इशारा दिला. 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनाचा मार्ग पुन्हा मुंबईकडे वळू शकतो, असे संकेत त्यांनी दिले आहेत.

पश्चिम महाराष्ट्रातील तीन दिवसांच्या दौऱ्यात जरांगे पाटील यांचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. विटा येथे तब्बल 30 जेसीबीच्या साह्याने त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली, तर ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी मोठा उत्साह दाखवला.
यावेळी ते म्हणाले, राज्यातील मराठा बांधव आंतरवाली सराटी येथे एकत्र येऊन तिथून मुंबईच्या दिशेने कूच करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्या या विधानामुळे याआधी वाशी आणि आझाद मैदानावर झालेल्या भव्य आंदोलनांनंतर आता मुबंईत भगव्या वादळाची शक्यता नाकारता येत नाही.

आपल्यावरील टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की, ते वापरत असलेली ‘डिफेंडर’ ही कार कार्यकर्त्यांनी प्रेमाने उद्घाटनासाठी पाठवली आहे, ती त्यांची स्वतःची नाही. स्वामी नावाच्या अधिकाऱ्याने राजकारणात न पडता आपले प्रशासकीय काम प्रामाणिकपणे करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

शासनाने कुणबी प्रमाणपत्र देऊन आपली चूक दुरुस्त करावी, अन्यथा जनतेचा रोष आणखी वाढेल असा इशारा त्यांनी दिला. गेल्या ३ वर्षांत अनेक मोर्चे निघूनही सरकारने समाजाला काय दिले, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी नाराजी व्यक्त केली. अनेक आमदार, खासदार आणि नारायण राणे यांच्यासारखे नेते आता या भूमिकेशी सहमत होत असल्याचे सांगत, मराठा समाज सरकारचा अहंकार निश्चितपणे मोडून काढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.







