बारामती, ता. 27: ‘राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेतील’ (नियाम) शास्त्रज्ञ व विद्यार्थ्याचा तळ्यातील पाण्यात पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला. शुक्रवारी (ता. 26) संध्याकाळी परिसरातील एका तळ्यामध्ये ही घटना घडली. (Baramati News)

बी. गोपालकृष्णन असे शास्त्रज्ञाचे तर, के. एस. हरिप्रसाद असे विद्यार्थ्याचे नाव आहे. एका विद्यार्थ्याचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात कर्तव्यदक्ष शिक्षकालाही आपले प्राण गमवावे लागल्याने संपूर्ण शैक्षणिक आणि वैज्ञानिक क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रात्यक्षिकाच्या कामासाठी पाण्याचा नमुना घेण्यासाठी विद्यार्थी या तळ्याजवळ गेलेले होते. नमुने घेत असतानाच के. एस. हरिप्रसाद हा विद्यार्थी पाय घसरून तळ्यात पडला. आपल्या सहकाऱ्याला पाण्यात बुडताना पाहून तिथे असलेल्या एका विद्यार्थिनीने मदतीसाठी आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून जवळच असलेले शास्त्रज्ञ बी. गोपालकृष्णन यांनी क्षणाचाही विलंब न लावता हरिप्रसादला वाचवण्यासाठी तळ्यात उडी घेतली. दुर्दैवाने पाण्याचा अंदाज न आल्याने आणि बचावाचे प्रयत्न अपयशी ठरल्याने दोघेही पाण्यात बुडाले.
दरम्यान, या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. माळेगावचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन लोखंडे, अमजद शेख, गणेश खंडागळे हे पोलिस कर्मचारी तातडीने घटनास्थळी धावले. या दोघांनाही पोलिस व्हॅनमधून दवाखान्यात आणण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी नमूद केले. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.







