बारामती: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या (Ajit Pawar Death) विमान अपघात प्रकरणात एफआयआर दाखल करण्याच्या मागणीसाठी बारामतीत मोठी जनआंदोलनाची (Ajit Pawar Plane Crash) परिस्थिती निर्माण झाली. हजारो बारामतीकर अचानक पोलीस ठाण्याबाहेर एकवटल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. घोषणाबाजी, बॅनर आणि हातात फलक घेऊन नागरिकांनी न्यायाची मागणी केली. (Baramati News)

रोहित पवार आणि युगेंद्र पवार हे पोलीस ठाण्यात दाखल होऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना बाहेर समर्थकांची गर्दी वाढतच होती. सुमारे 30 मिनिटांहून अधिक काळ नेत्यांची पोलिसांशी चर्चा सुरू होती. दरम्यान, पोलीस ठाण्याभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रस्त्यांवर वाहनांची वाहतूक काही काळ संथ झाली होती.
अजित पवार यांचे बंधू राजेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी सत्य समोर आणण्याची मागणी केली. “अपघाताचा सविस्तर अहवाल जाहीर करा”, “व्हीएसआर कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनावर दबाव वाढवला. काही समर्थकांनी ब्लॅक बॉक्सबाबतच्या विरोधाभासी माहितीकडे लक्ष वेधत संशय व्यक्त केला.
पोलीस ठाण्याबाहेर वातावरण तणावपूर्ण असले तरी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस फौज तैनात करण्यात आली होती. आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, गुन्हा दाखल होईपर्यंत ते मागे हटणार नाहीत.
दरम्यान, प्रशासनाकडून अद्याप अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र बारामतीतील या मोठ्या जमावाने विमान अपघात प्रकरणावरील असंतोष उघडपणे समोर आणला असून, पुढील काही दिवसांत परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







