पुणे : पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास अवघ्या दोन तासांत पूर्ण व्हावा, हे आपले स्वप्न असून त्यासाठी सहापदरी महामार्ग विकसित केला जात आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. या महामार्गामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर आणि पुढे नागपूरपर्यंतचा प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुंबई ते बंगळुरू प्रवास पाच तासांत पूर्ण करता यावा, यासाठीही रस्ते प्रकल्प विकसित केले जात असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले. पुण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

पुणे आणि परिसरासाठी ६० हजार कोटींचे रस्ते प्रकल्प
पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी येत्या दोन वर्षांत पुणे आणि परिसरात सुमारे ६० हजार कोटी रुपयांच्या विविध रस्ते प्रकल्पांची कामे केली जाणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. यामध्ये ३१ हजार ६०० कोटी रुपयांच्या शिरूर ते पुणे प्रकल्पाचाही समावेश आहे.

पुण्यातील प्रमुख रस्ते प्रकल्पांना मोठा निधी
पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विविध महत्त्वाच्या मार्गांवर मोठ्या प्रमाणात कामे हाती घेण्यात आली आहेत. हडपसर ते यवत मार्गासाठी ५,२६५ कोटी रुपये, तळेगाव-चाकण-शिक्रापूर या ५३ किलोमीटरच्या मार्गासाठी ४ हजार कोटी रुपये आणि शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या १९२ किलोमीटरच्या मार्गासाठी १५ हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

याशिवाय खेड ते नाशिक फाटा या ३० किलोमीटरच्या मार्गासाठी ८ हजार कोटी रुपये, रावेत ते नऱ्हे मार्गासाठी ६ हजार कोटी रुपये आणि पुणे ते सोलापूर मार्गासाठी ८ हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याची माहिती गडकरी यांनी दिली.
मुंबई ते बंगळुरू प्रवास पाच तासांत करण्याचे लक्ष्य
देशातील प्रमुख शहरांमधील कनेक्टिव्हिटी अधिक वेगवान करण्यासाठी नवीन महामार्ग विकसित केले जात आहेत. अटल सेतू ते पागोटे चौक आणि तेथून पुढे पुण्यापर्यंत नवीन रस्ता विकसित केला जात आहे. या मार्गामुळे पुण्याहून बंगळुरूपर्यंतचा प्रवास पाच तासांत पूर्ण करता येईल, अशी व्यवस्था उभारली जात असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
तसेच शिळफाटा ते पनवेल आणि जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या सुधारणेवरही भर दिला जात असून, या कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रस्ते प्रकल्पांमध्ये AI आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
पायाभूत सुविधा क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवण्यात येणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. सॅटेलाइटशी जोडलेल्या वाहनांच्या माध्यमातून रस्त्यांवरील त्रुटी आणि बांधकामातील दोष तातडीने शोधता येतील, अशी माहिती त्यांनी दिली.
पूर्वी मुंबई ते पुणे प्रवासासाठी सहा ते सात तास लागत होते. मात्र, नवीन महामार्गांमुळे हा प्रवास आता अडीच तासांच्या आसपास आला आहे. भविष्यात प्रवाशांना अधिक चांगल्या दर्जाच्या रस्ते सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी टोल द्यावा लागेल, असे मतही गडकरी यांनी व्यक्त केले.






