Pune News: पुणे, ता. 22 : आंतरराष्ट्रीय पातळीवरील तणावपूर्ण परिस्थितीमुळे देशात एलपीजी गॅसच्या उपलब्धतेबाबत निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या वाटपात 20 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे हॉटेल, रेस्टॉरंट तसेच लहान-मोठ्या खाद्य व्यवसायांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गेल्या काही दिवसांत अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील तणावामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो, अशा चर्चांना उधाण आले होते. काही ठिकाणी एलपीजी सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा लागल्याच्या घटनाही समोर आल्या होत्या. मात्र, केंद्र सरकारने वारंवार स्पष्ट केले आहे की देशात गॅसचा साठा पुरेसा असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
दरम्यान, घरगुती ग्राहकांना प्राधान्य देण्यासाठी व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्यावर काही प्रमाणात निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे विशेषतः लहान हॉटेल, ढाबे आणि कॅटरिंग व्यवसायावर मोठा परिणाम झाला होता. अनेक व्यावसायिकांना मर्यादित सिलेंडरवर काम भागवावे लागत होते.
ही परिस्थिती लक्षात घेऊन पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने राज्यांना दिल्या जाणाऱ्या व्यावसायिक एलपीजी कोट्यात 20 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रशासित प्रदेशांसाठी हा पुरवठा 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. 23 मार्चपासून हा निर्णय देशभर लागू होणार आहे.
या निर्णयामुळे बाजारातील गॅस उपलब्धता सुधारण्यास मदत होईल आणि हॉटेल-रेस्टॉरंट उद्योगासह इतर व्यावसायिक क्षेत्रातील कामकाज पुन्हा सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या अनिश्चिततेमुळे चिंतेत असलेल्या व्यावसायिकांसाठी ही घोषणा दिलासादायक ठरत आहे.







