Pune News: पुणे : पुण्यातील (Pune) विश्रांतवाडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महाविद्यालयात दांडी मारल्याबद्दल वडिलांनी जाब विचारल्याच्या रागातून १६ वर्षीय मुलाने घर सोडल्याची घटना घडली आहे. आळंदी रस्त्यावरील राजीव गांधीनगर भागातून हा मुलगा बेपत्ता (Missing) झाला असून, याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा- आकुर्डीत पोलिसांचा सापळा! महिलांना ढाल बनवून चालला होता कोट्यवधींचा खेळ, पण नशिबाने दिली हुलकावणी
घर सोडून गेलेल्या मुलाचे नाव योगेश श्याम दुनघव वय १६ असे आहे. तो खडकी येथील टिकाराम जगन्नाथ कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता १२ वीमध्ये शिक्षण घेत आहे. योगेश गेल्या दोन आठवड्यांपासून नियमितपणे महाविद्यालयात जात नसल्याचे त्याच्या वडिलांच्या लक्षात आले होते. याबाबत त्यांनी योगेशला विचारणा केली असता, तो क्रिकेट खेळण्यासाठी कॉलेजला दांडी मारत असल्याची कबुली त्याने दिली.
या कारणावरून वडिलांनी योगेशला समज देत जाब विचारला. वडिलांनी रागावल्याचा राग मनात धरून योगेशने कोणालाही काहीही न सांगता घर सोडले. तो बराच वेळ घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे आणि परिसरात त्याचा शोध घेतला. मात्र, योगेशचा कुठेही पत्ता लागला नाही.
अखेर कुटुंबीयांनी येरवडा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. मुलाला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले असावे, असा संशय पालकांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सध्या पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून तांत्रिक तपासाच्या मदतीने योगेशचा शोध सुरू आहे. मुलगा सुरक्षित सापडावा यासाठी पोलिसांकडून सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, नागरिकांनी योगेशबाबत काही माहिती मिळाल्यास तात्काळ येरवडा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.






